आता साधू संतांना उत्तर प्रदेशातील योगी सरकार देणार पेन्शन

yogi-aaditynath
लखनऊ: उत्तर प्रदेशातील योगी सरकार अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीस विलंब होत असल्याने संतप्त झालेल्या साधू संतांना शांत करण्यासाठी नवा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून साधू संतांना पेन्शन देण्याचा विचार सुरू आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सरकारचा या माध्यमातून जास्तीत जास्त साधू संतांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल.

राज्य सरकारकडून आतापर्यंत साधू संतांना पेन्शन दिली जात नव्हती. कागदपत्रे नसल्यामुळे साधू संतांना आतापर्यंत पेन्शनचा लाभ मिळत नव्हता, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली. पण प्रत्येक जिल्ह्यात आता यासाठी शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला असल्यामुळे वृद्धावस्थेतील साधू संतांना पेन्शन मिळू शकेल. राम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या साधू संतांना शांत करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पेन्शनची साधू संतांना फारशी माहिती नसल्यामुळे अशा योजनांपासून ते लांब राहतात आणि यासाठी अर्जच करत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. पण यासाठी आता योगी सरकारने साधू संतांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. साधू संतांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळायला हवा, असे सरकारनं ठरवले आहे. ही योजना लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

Leave a Comment