चौकशी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पांड्या आणि राहुलला खेळू द्या

BCCI
मुंबई – कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांसंदर्भात भारतीय संघातील खेळाडू हार्दिक पंडय़ा आणि लोकेश राहुल यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात ते सापडले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चे प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी याबाबत त्या दोघांची चौकशी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना खेळण्याची परवानगी द्यावी अशी मागणी प्रशासकीय समितीकडे केली आहे.

पांडय़ा आणि राहुल यांच्याकडून चूक झाली आहे. त्यांचे याबद्दल निलंबन करून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून माघारीसुद्धा बोलावण्यात आले आहे. दोघांनीही याप्रकरणी बिनशर्त माफीसुद्धा मागितली असल्यामुळे दोघांनाही चौकशी होईपर्यंत भारतीय संघाकडून खेळण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून न्यूझीलंड दौऱ्यावरील भारतीय संघात ते सहभागी होऊ शकतील, असे खन्ना यांनी प्रशासकीय समितीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

खन्ना यांनी पांडय़ा आणि राहुल यांच्या चौकशीसाठी लवाद अधिकारी नेमण्याकरिता विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यास नकार दिला आहे. पांडय़ा-राहुल यांची चौकशी प्रलंबित आहे. कारण चौकशीसाठी लवाद अधिकारी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त करावा, अशी मागणी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने केली आहे.

Leave a Comment