लोकसभेला दानवेंनी युतीशिवाय लढल्यास पराभव निश्चित – संजय काकडे

sanjay-kakade
पुणे: भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न केल्यास मोठा फटका बसेल. ४८ पैकी ४० मतदारसंघ तर सोडाच पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्वत:च्या मतदारसंघातही जिंकता येणार नाही. त्यांचा दीड-दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केले.

शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी संजय काकडे यांनी संवाद साधला. त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतील संभाव्य परिस्थितीवर यावेळी भाष्य केले. शिवसेना सोबत आली नाही तरी आम्ही ४० जागांवर विजयी होऊ, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला होता. पण दानवेंचा हा दावा संजय काकडेंनी साफ फेटाळून लावला. रावसाहेब दानवे यांना शिवसेना सोबत न आल्यास स्वत:चा मतदारसंघ राखता येणार नाही, असा दावा काकडेंनी केला. काकडे यांनी यावेळी पुण्यातील भाजप नेत्यांविषयी नाराजीही व्यक्त केली. यावेळी त्यांना भाजप तुमच्याबाबतीत ‘गरज सरो, वैद्य मरो’ वागत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा काकडे यांनी माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उत्तम जमत असल्याचे सूचक वक्तव्यही केले.

संजय काकडे पुण्यातील लोकसभेच्या जागेवर लढण्यासाठी इच्छूक आहेत. आपण गेल्या दोन वर्षांत पक्षासाठी केलेल्या कामाच्या आधारावर पक्षाकडून आपल्याला निश्चितपणे उमेदवारी मिळेल, असा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि गिरीश बापट यांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काकडे यांना संधी देणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळाच्या मनात आहे.

Leave a Comment