नवी दिल्ली – आयकर परताव्यामधील वेळ वाचविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ई-फायलिंग आणि केंद्रीय माहिती केंद्रात या निर्णयानुसार वेगवान तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यासाठी ४ हजार २४१.९७ कोटी मंजूर केल्यामुळे ६३ दिवसांचे आयकर परतावा भरुन पैसे खात्यावर मिळण्याचे काम एका दिवसात पूर्ण होणार आहे.
आयकर विभागासाठी निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली. ते म्हणाले, की दीड वर्षे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीन महिने चाचणी घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. इन्फोसिसची त्यासाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सीपीसी-आयटीआर १.० प्रकल्पाकरताही केंद्रीय मंत्रिमंडळाने १ हजार ४८२.४४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. आयकर विभागाशी थेट संबंध न येता नागरिकांना कर परताव्याचे पैसे थेट खात्यावर मिळणार आहेत. यामध्ये पारदर्शकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.