
लखनौ – बहुजन समाज पक्षाच्या (बसप) एका नेत्याने सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांना पळवून-पळवून मारू, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या नेत्याचे नाव विजय यादव, असे असून त्यांनी हे वक्तव्य मोरादाबाद येथील एका जनसभेला संबोधित करताना केले. उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांसाठी समाजवादी पक्ष (सपा) आणि बसपने आघाडी केली आहे. त्यानंतर तेथे राजकीय घडामोडींना उधाण आलेले दिसते.
बसप नेता म्हणतो, सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांना पळवून-पळवून मारू
राजकारणी निवडणूक तोंडावर येताच नेते मनाला येईल तशी वक्तव्य करत असतात. उत्तर प्रदेशच्या राजकारणाला सपा आणि बसपच्या आघाडीमुळे कलाटणी मिळाली आहे. तसेच बसप अध्यक्षा मायावती यांचा मंगळवारी वाढदिवसही होता. त्यासाठी मोरादाबाद येथे बसप आणि सपा या पक्षाने एक सभा आयोजित केली होती. त्यावेळी विजय यादव हे जनसभेस संबोधित करत होते.
आपल्या कार्यकाळात काँग्रेसने ३ गांधी दिले. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी. तर, भाजपनेही देशाला ३ मोदी दिले. त्यापैकी नीरव मोदी, ललित मोदी आणि अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी, असेही यादव यांनी आपल्या भाषणात म्हटले. सपा आणि बसपच्या आघाडीमुळे भाजपला भिती वाटत आहे. भाजपच्या मंत्र्यांना आपण पळवून-पळवून मारु, असे वक्तव्य त्यांनी केले.
