लोकसभा निवडणुकीतून अरविंद केजरीवाल यांची माघार

arvind-kejriwal
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लढणार नसल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते संजय सिंह यांनी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसी येथून निवडणूक लढवली होती. परंतु केजरीवाल यावेळी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूक केजरीवाल लढणार नसले तरी ते नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमध्ये मोठा उमेदवार उभा करणार एवढे मात्र नक्की असल्याचेही सिंह यांनी सांगितले.

याबाबत माहिती देताना संजय सिंह म्हणाले की, सध्या अरविंद केजरीवाल यांना फक्त दिल्लीवर लक्ष केंद्रित करायचे असल्यामुळे लोकसभा निवडणूक ते लढवणार नाहीत. परंतु वाराणसी येथून आम आदमी पार्टी मोदींविरोधात तगडा उमेदवार उभा करणार आहे. केजरीवाल यांनी 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत थेट मोदींना आव्हान दिले होते. परंतु मोठ्या मतफरकाने मोदींनी केजरीवाल यांना धूळ चारली होती. आम आदमी पार्टी आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदिगड येथील लोकसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील काही जागांवरही आम आदमी पक्ष आपले उमेदवार देणार आहे.

Leave a Comment