खोट्या आरोपांच्या आधारे मला हटवले – आलोक वर्मा

alok-verma1
नवी दिल्ली – सीबीआयचा कारभार कुठल्याही बाह्यशक्तींच्या प्रभावाशिवाय चालला पाहिजे. संस्थेचे अखंडत्व कायम ठेवण्यासाठी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात मी नेहमी उभा राहिलो. पण माझ्या विरोधातील एका व्यक्तीच्या आरोपांच्या आधारावर मला हटवण्यात आले, हे खुपच दुःखद असल्याचे म्हणत सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

आलोक वर्मा यांनी ही प्रतिक्रिया संचालक पदावरुन हटवण्यात आल्यानंतर दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे तब्बल ७७ दिवस सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची फेरनियुक्तीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी हकालपट्टी करण्यात आली. त्रिसदस्यीय निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय २ विरुद्ध १ अशा बहुमताने झाला. वर्मा यांच्या हकालपट्टीस काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोध केला होता.सीबीआयचा कारभार कुठल्याही बाह्यशक्तींच्या प्रभावाशिवाय चालला पाहिजे. सीबीआयची अखंडता नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. पण सीबीआय संचालक म्हणून ती अखंडता कायम टिकवण्याचा मी प्रयत्न केला. यानंतरही माझ्या याच भूमिकेशी मी ठाम राहीन, असेही वर्मा यांनी म्हटले आहे.

केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून एम. नागेश्वर राव यांच्याकडे पुन्हा सीबीआयची सूत्र सोपविण्यात आली आहेत. वर्मा यांची सीव्हीसीकडून सुरू असलेली चौकशीही कायम राहणार आहे. निवड समितीत पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते यांचा पदसिद्ध समावेश असतो. सरन्यायाधीश गोगोई यांनीच बुधवारी वर्मा यांना पदावर कायम करण्याचा निर्णय दिला होता. यामुळे त्यांनी या बैठकीत त्यांनी स्वतः येण्याऐवजी न्या. ए. के. सिक्री यांना पाठविले होते. तिसरे सदस्य काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी वर्मा यांची जोरदार पाठराखण केली. त्यामुळे ही बैठक अडीच तास लांबली. सिक्री यांनी मात्र सीव्हीसीचा अहवाल समाधानकारक असल्याचे सांगितले.

Leave a Comment