नवी दिल्ली – आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लवकरच केंद्र सरकारला अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असे म्हटले. आरबीआयकडून त्यासाठी अंतिम पाहणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात अर्थव्यवहार विभागाचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी आरबीआयकडून अंतरिम लाभांश मिळण्याची अपेक्षा असल्याचे स्पष्ट केले होते. केंद्र सरकारला हा अंतरिम लाभांश चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट ३.३ टक्क्यावर स्थिर ठेवण्यासाठी हवा आहे. आरबीआयने गतवर्षी १० हजार कोटींचा लाभांश केंद्र सरकारला दिला होता.
केंद्र सरकारला अर्थसंकल्पानुसार चालू आर्थिक वर्षात आरबीआयसह सरकारी बँका आणि वित्तसंस्थाकडून ५८ हजार ८१७ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. आरबीआयकडून चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारला ४० हजार कोटींचा लाभांश मिळणे अपेक्षित आहे. आरबीआयकडून केंद्र सरकारला गतवर्षी ५० हजार कोटींचा लाभांश मिळाला होता.