विराट कोहलीने केला आशियातील 29 कर्णधारांना न जमलेला पराक्रम !

virat-kohli
सिडनी : सोमवारी भारतीय संघाने इतिहास घडवला. यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने 2-1 अशी खिशात घातली. भारताला 72 वर्षांची प्रतीक्षा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजयाची चव चाखण्यासाठी पाहावी लागली. भारत 1947 मध्ये प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळली होती, पण भारताला एकदाही कसोटी मालिका विजय मिळवता आला नव्हता. याशिवाय आशियातील 29 कर्णधारांना न जमलेला पराक्रमही कोहलीने केला.

ॲडलेड व मेलबर्न कसोटी जिंकून भारतीय संघाने मालिकेत आघाडी घेतली होती. भारताने सिडनी कसोटीत पहिल्या डावातच 622 धावांचा डोंगर उभा केला. भारताने चेतेश्वर पुजारा (193) आणि रिषभ पंत (159*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. कंगारुंकडून दर्जेदार खेळ झाला नाही. 300 धावांवर त्यांचा पहिला डाव गडगडला. कुलदीप यादवने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देत भारताने आपला मालिका विजय पक्का केला. चौथ्या दिवशी बिनबाद 6 धावांवर असताना खेळ थांबला. सोमवारी पाऊस कायम राहिल्याने खेळ झाला नाही.

आतापर्यंत 11 मालिका जिंकण्यात भारताला अपयश आले. भारताने त्यापैकी 3 मालिका बरोबरीत सोडवल्या, तर 8 मालिकांत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास घडविला. 72 वर्षानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आली. 1947 मध्ये ऑस्ट्रेलियात येणारा भारत हा पहिला आशियाई देश होता.

कांगारूंच्या देशात आशियाई देशांनी एकूण 98 सामने खेळले आणि त्यापैकी केवळ 11 मध्ये विजय मिळवले. आतापर्यंत आशियाई देशांनी येथे 31 दौरे केले आणि त्यात 29 कर्णधारांनी आपापल्या संघाचे नेतृत्व केले. या 29 कर्णधारांनी मिळूण एकूण 8 सामने जिंकले, पण त्यापैकी एकालाही कसोटी मालिका जिंकता आली नाही. हा पराक्रम कोहलीने करून दाखवला. कोहली ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिलाच आशियाई कर्णधार ठरला आहे.

Leave a Comment