
प्रेक्षकांनी सलमान खान आणि भूमिका चावला यांची मुख्य भूमिका असलेल्या तेरे नाम या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. खऱ्या अर्थाने हा चित्रपट सलमानच्या चित्रपटसृष्टीतील करिअरचा टर्निंग पॉईंट ठरल्यानंतर सलमान खानने कधीही मागे वळून पाहिले नाही. पण सलमानचे या चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत काही कारणांमुळे वाद झाले होते. ही जोडी आता १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहे.
१६ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार सलमान खान आणि सतीश कौशिक
एका माध्यमाशी बोलताना याबद्दलची माहिती तेरे नाम चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी दिली असल्याचे म्हटले जात आहे. असे झाल्यास पुन्हा एकदा प्रेक्षकांना १६ वर्षांनंतर या धमाकेदार जोडीचा चित्रपट नव्या रूपात अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानच करणार असल्याचेही म्हटले जात आहे. सलमान सध्या आपल्या आगामी भारत चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. कॅटरिना कैफही या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाचीदेखील आतुरतेने वाट पाहत आहेत.
