नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आधार हा ‘गेमचेंजर’ ठरला असल्याचे मत व्यक्त केले असून ९० हजार कोटींची बचत आधारच्या अंमलबजावणीमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. आयुष्यमान भारत योजनेएवढ्या तीन समाज कल्याणाच्या योजना या बचतीतून पूर्ण होऊ शकतात, असा त्यांनी दावा केला. त्यांनी याबाबत फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.
आधारची यशस्वी अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याचे अरुण जेटली यांनी म्हटले आहे. आधारबाबत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए सरकार निरुत्साही होते. कारण त्यांच्यामध्येच अंतर्विरोध आणि असमंजसपणा होता. सध्याच्या काळात आधारचे फायदे या नावाने अरुण जेटली यांनी आधारबाबत मत व्यक्त केले आहे. बनावट कागदपत्रे, खोटे आणि अस्तित्वात नसलेल्या लाभार्थ्यांना आधारने योजनेतून वगळण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. जागतिक बँकेने तयार केलेल्या डिजीटल डिव्हिडंड रिपोर्टनुसार आधारमुळे देशाचे ७७ हजार कोटी रुपये वाचू शकतात.