लखनौ – समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परवानगी दिल्यास राज्यातील सर्व भटक्या गाईंचा सांभाळ करायला आपण तयार असल्याचे म्हटले आहे.
नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार उत्तर प्रदेशातील रस्त्यांवरील भटक्या गुराढोरांच्या संख्येत वाढ झाली आहे. खान यावर बोलताना म्हणाले, की गाईला आपली माता समजणारे लोक अशाप्रकारे त्यांना रस्त्यावर सोडतात हे फार संतापजनक आहे. यासाठी जबाबदार असणा-यांना शिक्षा व्हायला हवी. योगी आदित्यनाथ यांनी परवानगी दिल्यास आपण राज्यातील सर्व गाईंची काळजी घ्यायला तयार आहोत, असे खान म्हणाले.
उत्तर प्रदेश सरकारने भटक्या जनावरांच्या संख्येतील वाढ पाहता यासाठी राज्यभरात गाईंसाठी शेड उभारण्याची योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही योजना भटक्या जनावरांवरुन आंदोलने व्हायला लागल्यानंतर सुरू केली. राज्य सरकारने गाईंना शेड उभारण्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत.