सिडनी कसोटी – भारताचा पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलिया दिवसअखेर बिनबाद २४

team-india
सिडनी – ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद २४ धावा केल्या. त्याआधी ७ बाद ६२२ धावांवर भारताचा पहिला डाव घोषित करण्यात आला. भारताने ही मजल चेतेश्वर पुजारा (१९३) आणि ऋषभ पंत (१५९*) यांच्या दीडशतकी खेळाच्या जोरावर मारली. या दोघांशिवाय मयंक अग्रवाल (७७) आणि रवींद्र जाडेजा (८१) यांनी अर्धशतकी खेळी केली. ऑस्ट्रेलिया दिवसअखेर ५९८ धावांनी पिछाडीवर आहे.

भारताने पहिल्या दिवशी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. पण अडखळती भारतीय संघाची सुरुवात झाली. अवघ्या ९ धावाच संघात पुन्हा संधी मिळालेल्या लोकेश राहुलला करता आल्या. त्याला जॉश हेजलवूडने माघारी पाठवले. नवोदित मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सावरल्यामुळे भारताने उपहारापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात ६९ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या सत्रात मयंक ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावा करून झेलबाद झाला. त्याने पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी रचली. कर्णधार विराट कोहलीला हाताशी घेत चेतेश्वर पुजाराने डाव पुढे नेला. पुजाराने अर्धशतक पूर्ण करत चहापानापर्यंत भारताला २ गड्यांच्या मोबदल्यात १७७ धावांपर्यंत मजल मारून दिली. कर्णधार कोहली शेवटच्या सत्रा आधी २३ धावांवर आणि काही कालावधीने उपकर्णधार अजिंक्य रहाणे १८ धावांवर तंबूत परतल्यामुळे भारताने पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३०३ अशी भक्कम धावसंख्या उभारली होती.

आज खेळाला त्यापुढे सुरुवात झाली. नॅथन लॉयनने पहिल्या सत्रात विहारीचा बळी टिपला. ४२ धावा त्याने केल्या. चेतेश्वर पुजाराने आपला फॉर्म कायम राखत दीडशतक लगावले, पण द्विशतकाने त्याला हुलकावणी दिली. तो १९३ धावांवर बाद झाला. ऋषभ पंतने नाबाद १५९ धावा केल्या. अखेर जाडेजा ८२ धावांवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव घोषित करण्यात आला.

Leave a Comment