मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारने बंद केली 10 वर्षांची परंपरा

kamalnath
भोपाळ – वादाने मध्य प्रदेशमध्ये नवीन वर्षाची सुरुवात झाली असून भाजप सरकारच्या काळात महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी कार्यालयात ‘वंदे मातरम’ म्हणण्याची सुरु झालेली परंपरा काँग्रेस सरकारने बंद केली आहे. यामागे कोणतेही राजकारण नसल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्पष्ट केले असून एक दिवस वंदे मातरम म्हटले नाही म्हणून तो व्यक्ती देशभक्त ठरत नाही का?, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी कार्यालयांमध्ये वंदे मातरम म्हणणे मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकारच्या काळात बंधकारक करण्यात आले होते. पण आता मध्य प्रदेशमध्ये सत्ता बदल झाला असून राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. 1 जानेवारी रोजी सरकारने सरकारी कार्यालयांमधील वंदे मातरम बंधनकारक नसेल, असे सांगितले आणि गेल्या 10 वर्षांपासून सुरु असलेली परंपरा बंद झाली. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले.

काँग्रेसने ही प्रथा पुन्हा सुरु करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. तर भाजपच्या अन्य नेत्यांनी काँग्रेसचा हा अजेंडा असल्याचा आरोप केला. तर हे आरोप मुख्यमंत्री कमलनाथ यांनी फेटाळून लावले आहे. या निर्णयाला आम्ही तात्पुरती स्थगिती दिली आहे. वंदे मातरमला आमचा विरोध नाही. लवकरच हा नियम आम्ही पुन्हा लागू करु, फक्त नव्या स्वरुपात याची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. फक्त एक दिवस वंदे मातरम म्हटल्याने कोणीही देशभक्त ठरत नाही, असे त्यांनी भाजपला सुनावले आहे.

Leave a Comment