‘जयकांत शिकरे’ ‘या’ पक्षाकडून लढवणार लोकसभा निवडणूक

parkash-raj
बंगळुरू : अभिनेते प्रकाश राज यांनी बॉलिवूडनंतर आता राजकारणात एंट्री केली असून 2019 ची लोकसभा निवडणूक मी लढवणार असल्याची घोषणा प्रकाश राज यांनी ट्विटरवरून केली आहे.

गेल्या काही काळापासून प्रकाश राज हे केंद्र सरकारवर परखड टीका करत आहेत. ते मोदी सरकारविरोधी कठोर भूमिकेसाठी चर्चेत आहेत. अशातच आता त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेते प्रकाश राज यांनी ‘सिंघम’ या चित्रपटात साकारलेल्या ‘जयकांत शिकरे’ या खलनायकी पात्राद्वारे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. मी तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याच्या जोरावर अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहे. लवकरच मतदारसंघाबाबतची माहिती देईल. अबकी बार जनता की सरकार!’ असे ट्वीट प्रकाश राज यांनी केले आहे.

मूळचे कर्नाटकचे असणाऱ्या प्रकाश राज यांनी कन्नड टेलिव्हिजनपासून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. त्यानंतर कन्नड, तामिळ सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाची मोहर उमटवली. दक्षिण चित्रपटांत आपल्या भूमिका चोख बजावणाऱ्या प्रकाश राज यांनी नंतर बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यांची बॉलिवूडमधील एंट्रीही यशस्वी ठरली. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाश राज यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गौरी लंकेश यांच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या लोकांना ट्विटरवर फॉलो करतात, असा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर आक्रमक झालेल्या प्रकाश राज यांनी पुढे अनेक मुद्द्यांवरून सरकारविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment