
सर्वसाधारणपणे जेथे मजार अथवा मकबरा असले तेथे फुले किंवा फुलांची चादर घालण्याची प्रथा आपण पाहतो. इच्छापूर्ती अथवा नवस बोलताना अशी चादर घातली जाते. मात्र उत्तरप्रदेशात एक मकबरा असा आहे ज्याला लोक जोडे मारतात. इटावा फरुखाबाद बरेली मार्गावर हा चुगलखोर का मकबरा असून येथून जाणारे प्रवासी त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून येथे मकबरयाला जोडे मारतात. या मकबरयावर भूतांची सावली आहे असा समज आहे. त्यामुळे येथून जाताना वाहनाला अपघात होऊ नये म्हणून जोडे मारण्याची पद्धत आहे.
चुगलखोरच्या मकबरयाला मिळतो जोड्यांचा प्रसाद
याची हकीकत अशी सांगतात ५०० वर्षापूर्वी इटावाच्या बादशाहने अटेरीच्या राजाबरोबर युद्ध केले. त्याला कारण झाला भोलू सैद नावाचा माणूस. हा माणूस अतिशय चहाडखोर होता. त्याने बादशहाच्या मनात अटेरीचा राजा त्याचा द्वेष करतो, त्याचे वाईट चिंततो असे भरवून दिले आणि त्या रागात बादशाहने अटेरीच्या राजाबरोबर युद्ध केले. मात्र नंतर बादशाहाला समजले कि त्याचा समज चुकीचा होता. म्हणून त्याने भोलूला ठार होईपर्यंत जोडे मारण्याचा आदेश जनतेला दिला. त्याप्रमाणे जोडे खाऊन भोलू ठार झाला. मात्र अजूनही हि परंपरा सुरु असून लोक भोलू सैदच्या कबरीवर जोडे मारतात.
असेही सांगतात कि या रस्त्यावरचा प्रवास सुखरूप आणि अपघात न होता करायचा असेल तर या मकबरयाला किमान ५ वेळा जोडे मारावे लागतात.
