भारतीय कसोटी संघात पदार्पणासाठी मयंक अगरवाल सज्ज

mayank-agarwal
मेलबर्न – भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या कसोटी मालिकेतील तिस-या सामन्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. या संघातून सातत्याने अपयशी ठरलेल्या मुरली विजय आणि लोकेश राहुलला डच्चू देण्यात आला आहे. दुखापतीतून आर अश्विन अजूनही सावरला नसल्यामुळे संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. या सामन्यातून कर्नाटकचा फलंदाज मयंक अगरवाल आपले कसोटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

विजय आणि राहुलला वगळल्यामुळे मयंक अगरवालसोबत हनुमा विहारी सलामीला उतरण्याची शक्यता आहे. दुस-या कसोटीत खेळलेल्या उमेश यादवला काढून रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे. संघात दुखापतीतून सावरलेल्या रोहित शर्माला पुन्हा स्थान देण्यात आले आहे.

अॅडलेडमधील पहिल्या कसोटी सामन्यातील विजयानंतर खराब फलंदाजी आणि चार वेगवाग गोलंदाज खेळवण्याचा डाव उलटल्यामुळे पर्थमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यातून धडा घेत आता उमेश यादव ऐवजी रवींद्र जडेजाला मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अगरवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, रिषभ पंत ( यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रित बुमराह.

Leave a Comment