संघाच्या मा.गो. वैद्य यांच्याकडून राहुल गांधी यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक

MG-Vaidya
नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी ज्येष्ठ प्रचारक मा.गो. वैद्य यांनी तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध झाले असल्याचे वक्तव्य व्यक्त केले. राहुल गांधींची संघाच्या माजी प्रचारकांनी स्तुती केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

भाजपचा मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. मा. गो. वैद्य यांनी या पार्श्वभूमीवर या निकालावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, काँग्रेसला तीन राज्यातील विजयामुळे राहुल गांधी यांच्या रूपाने मेहनत करणारा नेता मिळाला आहे. या पक्षासाठी ही चांगली बाब आहे. दोन प्रमुख पक्ष लोकशाहीत प्रबळ असणे आवश्यक आहे. कोणत्याही एका पक्षाचा प्रभाव लोकशाहीसाठी हितकारक नसल्याचे त्यांनी नमूद केले.

दीर्घ काळ सत्तेत कोणताही पक्ष राहू शकत नाही. गेल्या १५ वर्षांपासून भाजपची छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये सत्ता होती आणि राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता परिवर्तन होत असते. एखादा पक्ष दीर्घ काळ सत्तेत राहू शकत नाही, हे निकालातून सिद्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या नेत्यांनी तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवातून काय धडा घ्यावा, असे त्यांना विचारले असता त्यांना मी काय सांगणार? त्यांची ही अंतर्गत बाब आहे असे सांगत वैद्य यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

Leave a Comment