भारत आणि नेपाल या दोन देशादरम्यान धावणाऱ्या पहिल्या प्रवासी रेल्वेगाडीची चाचणी रविवारी यशस्वी झाली असून या गाडीच्या स्वागताचा दोन्ही देशातील नागरिकांत एकाच उत्साह दिसून आला. बिहारमधील बथना पासून नेपाल मधील मोरंगपर्यंत हि गाडी धावणार असून चाचणी रेल्वेच्या स्वागतासाठी हजारो लोक उपस्थित होते असे समजते. या गाडीच्या दोन्ही बाजूला भारत आणि नेपाळचे ध्वज लावले गेले होते.
हा रेल्वेमार्ग १८.१ किमीचा असून त्यासाठी ४८०० कोटी रु. खर्च केला गेला आहे. हा खर्च भारताने नेपाळला आर्थिक सहकार्य म्हणून उचलला आहे. या दोन्ही देशादरम्यान डिसेम्बरपासून ब्रॉडगेज प्रवासी रेल्वे सुरु केली जाणार आहे असेही समजते. बिहारच्या जयनगर ते नेपाळच्या जनकपुर पर्यंत ३४ किमी अंतर हि गाडी धावणार आहे. या प्रवासासाठी नेपाळी अथवा भारतीयांना व्हिसाची गरज नाही. भारत नेपाळ दरम्यान चार विविध मार्गावर रेल्वेसेवा सुरु केली जाणार असून नेपाळ चीन रेल्वे संदर्भात हि बाब महत्वाची ठरणार आहे.