देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांना आणखी एक धक्का दिला आहे. येत्या बुधवार पासून या बँकेच्या ग्राहकांना आणखी एका निर्बंधाचा सामना करावा लागणार आहे.
एसबीआयचा ग्राहकांना आणखी एक धक्का, आणखी एक निर्बंध
येत्या कि 31 ऑक्टोबरपासून एसबीआयच्या एटीएममधून 20 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही, असे बँकेने जाहीर केले आहे. आतापर्यंत ही मर्यादा 40 हजार रुपये एवढी होती. एसबीआयच्या या निर्णयामुळे बँकेच्या सुमारे 1.42 कोटी खातेदारांवर परिणाम होणार आहे.
एसबीआयचे बहुतांश खातेदार दररोज 20 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढत नाहीत. मात्र व्यापारी देवघेवीसाठी काही जण एटीएममधून दररोज 40 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढत आहेत. यामुळे एटीएमजवळ रक्कम काढताना फसवणूक होण्याच्या तक्रारी मिळत आहेत, असे एसबीआयने म्हटले आहे. तसेच कॅशलेस / डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठीही हा निर्णय घेण्यात आला आहे.
एसबीआयच्या क्लासिक आणि माएस्ट्रो डेबिट कार्डधारकांवर हे निर्बंध लागू होणार आहेत. यापुढे ज्यांना दररोज 20 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढायची आहे, त्यांना हाय वेरियंट डेबिट कार्डसाठी अर्ज करावा लागणार आहे.