नागपूर – आज रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) वार्षिक विजयादशमी कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुरक्षेच्या बाबतीत देशाने सतर्क राहिले पाहिजे, सुरक्षेची सर्व जबाबदारी फक्त सरकारची नसून, प्रत्येक नागरिकांची ही नैतिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले.
देशाच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी सरकारवर ढकलणे योग्य नाही – मोहन भागवत
सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघ स्वयंसेवकांच्या पथ संचलनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन केले. नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदींसह भाजपचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.
देशाने सुरक्षेच्या बाबतीत सतर्क राहिले पाहिजे, फक्त सरकारवर सुरक्षेची सर्व जबाबदारी ढकलणे योग्य नाही. प्रत्येक नागरिकांची ही नैतिक जबाबदारी आहे. आपण आपल्या सुरक्षेसाठी दुसऱ्यावर निर्भर राहू नये. सुरक्षेत आपण अधिक स्वावलंबी व्हायला हवे. स्वावलंबन नाही तर सुरक्षितता नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.