‘आधार’मुळे मोबाईल फोन बंद होणार हे वृत्त काल्पनिक आणि चुकीचे : यूआयडीएआय

aadhar
नवी दिल्ली : टेलीकॉम विभाग आणि युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्डमुळे मोबाईल फोन नंबर बंद होणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत आज (१८ ऑक्टोबर) टेलीकॉम विभाग आणि आधारने संयुक्त निवेदन जारी केले आहे.

जर नव्या व्हेरिफिकेशनमध्ये आधार क्रमांक व्हेरिफेकेशनच्या आधारावर जारी केलेले सिम कार्ड फेल ठरले, तर हे सिम कार्ड डिसकनेक्ट केले जाऊ शकतात. यामुळे मोबाईल फोन वापरणाऱ्या देशभरातील ५० कोटी युझरचे फोन बंद होऊ शकतात, असे वृत्त प्रसारित झाले होते. पण यूआयडीएआय, आधार प्राधिकरणाने हे वृत्त काल्पनिक आणि चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाल दिला होता की, व्हेरिफिकेशनसाठी खासगी कंपन्या आधार क्रमांकाचा वापर करु शकत नाहीत. फोन कनेक्शन किंवा बँक खाती आता आधारशी लिंक करणे गरजेचे नाही. खासगी कंपन्या युझरकडून याची मागणीही करु शकत नाहीत. सरकारमध्ये या मुद्द्यावर उच्च स्तरावर विचारविनिमय सुरु आहे. कारण जर मोठ्या संख्येने मोबाईल नंबर डिसकनेक्ट केले तर नागरिकांवर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे सरकार नव्या केवायसीसाठी युझरना आवश्यक वेळ देईल.

आधार प्रकरणात सुनावणी करताना आदेश दिला होता की, मोबाईल कंपन्या युझरच्या ओळखीसाठी आधार क्रमांकाचा वापर करु शकत नाही. परंतु ५० कोटींपेक्षा जास्त मोबाईल नंबर आधार क्रमांकावरच सुरु होते. आधार क्रमांक हटल्यानंतर आणि त्याऐवजी दुसरे वैध जमा न केल्यास मोबाईल नंबर बंद होऊ शकतो. याची काळजी सरकारला असून उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. आधार हटवून त्याऐवजी नवे ओळखपत्र जमा करेपर्यंत मोबाईल युझरला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कमीत कमी अडचणींसह हे प्रकरण कसं निकाली काढता येईल, याचा सरकार विचार करत असल्याचे टेलीकॉम सचिव अरुणा सुंदरराजन म्हणाल्या.

Leave a Comment