‘सर्व शिक्षा अभियाना’च्या पुस्तकात संभाजी महाराजांचा वादग्रस्त उल्लेख

sambhaji-maharaj
पुणे – संभाजी महाराजांविषयी सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात वादग्रस्त उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला असून या पुस्तकात ‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख केल्याचे समोर आले आहे. या पुस्तकावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.
sambhaji-maharaj1
‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा सर्व शिक्षा अभियानात समावेश असून डॉ. शुभा साठे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. नागपूरमधील लाखे प्रकाशनाने पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या पुस्तकातील पान क्रमांक १८ वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे. संभाजीराजांनी रायगडावरुन केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात संभाजी राजा सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. समर्थांनी अखेर संभाजीराजांना पत्र लिहिले, असा उल्लेख या पुस्तकात आहे.

दरम्यान संभाजी ब्रिगेडने संभाजी महाराज दारुच्या कैफात होते, या वाक्यावर आक्षेप घेतला आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात कुठलाही पुरावा नसताना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. हा निव्वळ करंटेपणा असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शालेय प्राथमिक पुस्तकात असा भयंकर मजकूर छापला जातो हे राज्य सरकारचे दुर्दैव असल्याचेही ब्रिगेडने म्हटले आहे.

Leave a Comment