जो संसारिक नाही, त्याला महागाई काय समजणार; अजित पवार

ajit-pawar
पुणे – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महागाईवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. देशाला मोदीसाहेब न्याय देऊच शकत नाहीत. देशाला न्याय केवळ संसारी माणसूच न्याय देऊ शकतो. संसार ज्याने केला नाही. त्याला महागाई काय समजणार, असा टोला त्यांनी लगावला.

अजित पवार इंदापूर येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात सगळीकडे मी सांगत असतो. महागाई प्रचंड वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी न्याय देऊ शकत नाहीत. जो संसार करत नाही त्याला घरी गेल्यावर काय काम नसते. आम्ही संसारी आहोत. घरी गेल्यावर गॅस वाढला, पैसे संपले, महिन्याचे पैसे २० दिवसांत संपले, पेट्रोलचे दर वाढले… हे सर्व ऐकून घ्यावे लागते, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

ते पुढे म्हणाले, मोदींचे तसे नाही. ते एकटा जीव सदाशिव आहेत. त्यांना घरी कोणी सांगायलाच नसल्यामुळे घरी गेले की निवांत झोपायचे. अशा गोष्टींची चर्चा होत नसल्यामुळे याची झळ बसायचा प्रश्नच नाही. आमची अवस्था मात्र पांडू हवालदार, सोंगाड्यासारखी झाल्याचे त्यांनी म्हटले.

Leave a Comment