नागपूर – नागपुरात भाजप पक्षाला मोठा धक्का बसला असून आमदार आशिष देशमुख यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे नागपुराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भाजप आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा
अनेकदा राज्यसरकारला घरचा आहेर देणारे भाजपचे आमदार आशिष देशमुख लवकरच पक्षाला रामराम ठोकतील, असे वारे नागपूरच्या राजकीय क्षेत्रात सुरू होते. ते यासंदर्भातील घोषणा काटोल फेस्टीवल दरम्यान करतील असेही बोलले जात होते. पण त्यांनी मंगळवारी त्यांचा राजीनामा मुंबई विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना ई-मेल केला आहे. बागडे यांना बुधवारी प्रत्यक्ष भेटून ते राजीनामा देणार आहेत.
वेगळ्या विदर्भाचे आमदार आशिष देशमुख समर्थक आहेत. त्यांनी यासाठी अनेकदा आंदोलनही केले आहेत. त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीपासून आत्मबळ यात्रा काढली होती. याशिवाय त्यांनी अनेकदा सरकारला धारेवर धरणारी वक्तव्य केल्याने पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.