भारतातून मसाले घेऊन निघालेले जहाज तब्बल चारशे वर्षांनी सापडले

ship
पोर्तुगालच्या सागरी किनारपट्टीवर एका विवक्षित जहाजाच्या शोधामध्ये असलेल्या पुरातत्ववेत्त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या तज्ञांना लिस्बनच्या किनारपट्टीच्या नजीक तब्बल चारशे वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेल्या जहाजाचे अवशेष सापडले आहेत. या जहाजावरून भारतातून पोर्तुगाल येथे निर्यात करण्यात आलेले मसाले होते. या पुरातत्ववेत्त्यांच्या टीमच्या प्रमुखांच्या नुसार, हा शोध या शतकातील सर्वात महत्वाच्या शोधांपैकी एक म्हणता येऊ शकेल. पोर्तुगालच्या दृष्टीने देखील हा अत्यधिक महत्वाचा शोध असल्याचे त्यांनी सांगितले.
ship1
या जहाजाच्या अवशेषांच्या आसपासच्या परिसरामध्ये मसाल्यांचे अवशेषही पुरातत्ववेत्त्यांना सापडले आहेत. या अवशेषांच्या जोडीने नऊ तोफाही सापडल्या असून त्यांवर पुर्तुगीझांचे राजचिन्ह अंकित असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच चीनी मातीची भांडी आणि तत्कालीन चलनात असलेली नाणीही सापडली आहेत. हे नाणी खास गुलामांच्या खरेदी विक्रीकरिता वापरली जात असल्याचे तज्ञ म्हणतात.
ship2
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला या जहाजाचे आणि त्यावरून नेण्यात येत असलेल्या वस्तूंचे अवशेष लिस्बनच्या किनारपट्टीजवळ सापडले होते. पण या जहाजाला जलसमाधी मिळून इतकी वर्षे लोटल्यानंतरही अवशेष पुष्कळ चांगल्या स्थितीमध्ये असल्याबद्दल तज्ञांनी समाधान व्यक्त केले. पुरातत्ववेत्त्यांच्या नुसार हे जहाज १५७५ ते १६२५ या काळादरम्यान बुडाले असावे असा अंदाज वर्तविला जात असून, त्या काळादरम्यान भारतातून पोर्तुगालमध्ये मसाल्यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जात असे.
ship3
याच परिसरामध्ये १९९४ साली आणखी एका पोतुगीझ जहाजाचे अवशेष आढळले होते. हा परिसर टागस नदीचा उगमाचा परिसर असून, या ठिकाणी अनेक जहाजांना जलसमाधी मिळाली असल्याचे तज्ञ सांगतात. मसाले वाहून नेणारे हे जहाज शोधण्यासाठी या तज्ञांना काही वर्षे अथक प्रयत्न करावे लागले असून, त्यांच्या या प्रयत्नांना लिस्बनच्या म्युनिसिपल काउन्सिल आणि पोर्तुगीज सरकारचे सहाय्यही लाभले होते.

Leave a Comment