हाताच्या बोटामध्ये कासवाच्या आकाराची अंगठी कशासाठी परिधान केली जाते?

ring
भारतामध्ये ज्योतिषशास्त्राचे महत्व प्राचीन काळापासून चालत आले आहे. एखाद्याच्या कुंडलीमध्ये असलेले ग्रहमान, त्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना घडवून आणणारे असते. ग्रह शुभ असतील, तर त्या काळामध्ये त्या व्यक्तीला त्याचे शुभफल मिळत असते. त्या काळामध्ये व्यक्तीच्या आयुष्यामध्ये समाधान, यश, भरभराट, उत्तम आरोग्य अनुभविता येते. पण जर त्या काळापुरते ग्रहमान अशुभ असेल, तर त्या काळामध्ये अनेक अशुभ, दुर्दैवी घटनांना तोंड द्यावे लागू शकते. या अशुभ ग्रहांच्या शांती करिता ज्योतिषशास्त्रामध्ये अनके उपाय सांगितले गेले आहेत. अशुभ ग्रहांच्या शांती करिता त्या ग्रहांशी संबंधित रत्ने परिधान करणे हा उपाय बहुतेक वेळी अवलंबिला जात असतो. काही प्रसंगी ग्रहांच्या शांती करिता काही खास पूजा, हवनेही सांगितली जात असतात.
ring1
रत्ने धारण करण्याशिवाय कासवाच्या आकाराची अंगठी घालण्याचा सल्लाही काहींना दिला जातो. ही अंगठी धारण करण्यामागचे नेमके प्रयोजन काय असते, हे जाणून घेऊ या. अश्या प्रकारच्या कासवाच्या आकाराच्या अंगठीला ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय शुभ मानले गेले आहे. ही अंगठी धारण केल्याने अशुभ ग्रहांच्या दोषांपासून मुक्तता होते, आणि व्यक्तीचा आत्मविश्वास बळावतो. शास्त्रांमध्ये कासवाला उन्नती आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. कासवाला लक्ष्मीचे म्हणजेच धनाचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळेच ही अंगठी धारण केल्यास आर्थिक संपन्नता येते. कासवाच्या आकाराची अंगठी, चांदीचा वापर करून बनवविणे शुभ मानले गेले आहे.
ring2
ही अंगठी उजव्या हाताच्या पहिल्या किंवा मधल्या बोटांमध्ये घालण्याचा सल्ला दिला जातो. ही अंगठी अश्या प्रकारे घातली जावी, की जेणेकरून त्यावरील कासवाचे तोंड, अंगठी धारण करणाऱ्या व्यक्तीच्या दिशेला असेल. कासव लक्ष्मीचे प्रतीक असल्याने ही अंगठी शुक्रवारच्या दिवशी धारण केली जावी. अनेक व्यक्तींना हातातील अंगठी बोटांनी फिरवत राहण्याची सवय असते. या अंगठीच्या बाबतीत मात्र असे करणे अपायकारक ठरू शकते. अंगठी धारण करताना त्यावरील कासवाचे तोंड, ती अंगठी धारण करणाऱ्या व्यक्तीच्या दिशेलाच असल्याची खबरदारी घेतली जावी.

Leave a Comment