सुंदर हवेल्या, गड किल्ले, अनेक मंदिरे, सुदूर पसरलेले वाळवंट यासाठी आजपर्यंत प्रसिद्ध असलेल्या राजस्थानात आता युद्धभूमी पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. युद्धभूमी पर्यटनाची संकल्पना भारतात नवीन असली तरी आफ्रिकेतील काही देशात तसेच अमेरिकेत ती चांगलीच लोकप्रिय आहे.
राजस्थान असे राज्य आहे जेथे इतिहासात अनेक महत्वाच्या लढाया लढल्या गेल्या आहेत. पर्यटकांना जेथे या लढाया झाल्या त्या जागी नेऊन इतिहासातील या प्रसिद्ध लढायांची माहिती देण्यात येणार आहे. या ठिकाणांचा पर्यटन केंद्रे म्हणून विकास करण्यात येणार असून त्यासाठी इंडिअन हॉटेल असो. कडून अश्या ठिकाणांचा शोध घेतला जात आहे.
राजस्थानात हल्दीघाट, मेवाड, चितोडगड, जेसलमेर, रणथांबोर अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे घनघोर युद्ध संग्राम झाला आहे. भारतीय इतिहासातील हा मोठा अध्याय म्हणता येईल. पर्यटकांना अश्या जागा पाहण्याची क्रेझ असते ती यामुळे पुरी होणार आहे. नागालंड मधील कोहिमा येथे ब्रिटिशांच्या बाजूने लढताना भारतीय सेनेने जपान विरुद्ध युद्ध केले होते. तेथील कबरस्तान, १८५७ च्या बंडाशी संबंधित असलेल्या दिल्ली, मेरठ, झाशी, कानपूर, लखनौ या ठिकाणीही युद्धभूमी पर्यटन विकसित करण्याचा विचार केला जात आहे आणि काही प्रवासी कंपन्यांनी त्यात रस दाखविला असल्याचे समजते.