बोस्टन – वाढत्या प्रदुषणामुळे देशातील वातावरणात कार्बन डाइऑक्साइडच्या प्रमाणात सतत वाढ होत असल्यामुळे करोडो भारतीयांना २०५० पर्यंत पोषक घटकांची कमतरतेमुळे धोकादायक आजार होण्याची शक्यता असल्याचे एका संशोधनात सिद्ध झाले आहे. तांदुळ व गहू या सारख्या पिकांमधील पोषक तत्वे कमी होत आहेत.
अमेरिकेच्या हार्वर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांच्या दाव्यानुसार, कार्बन डाइऑक्साइडचे प्रमाण जगात वाढत असल्यामुळे जगभरातील १७.५ कोटी लोकांमध्ये झिंक आणि १२.२ कोटी लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘नेचर क्लाइमेट चेंज’ जर्नलमधील अभ्यासक्रमानुसार १ अब्जहून अधिक महिला आणि मुलांच्या आहारामध्ये लोहच्या प्रमाणात खूप कमतरता येण्याची शक्यता आहे. यामुळे अनिमिया आणि त्या यासारखे अन्य आजार होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
संशोधकांच्या संशोधनानुसार प्रोटीनच्या कमतरतेमुळे भारतातील ३.८ कोटी लोकांमध्ये आणि लोहाच्या कमतरतेमुळे ५०.२ कोटी महिला आणि मुले यासंबंधीचे आजार होण्याची शक्यता आहे. दक्षिण अशिया, दक्षिणपूर्व अशिया, आफ्रिका आणि पश्चिम अशियाच्या काही देशांवरही याचा प्रभाव जाणवू शकतो.