गैरव्यवहारांची एकामागोमाग प्रकरणे बाहेर येत असलेल्या बँकिंग क्षेत्राची प्रकृती अजूनही नाजूक असून बँकिंग क्षेत्रातील आणखी घोटाळे बाहेर येण्याची शक्यता आहे, असा गंभीर इशारा पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी दिला
रविवारी इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्स या संस्थेत मित्र यांचे भाषण झाले. त्यावेळी मित्रा म्हणाले, की मार्च 2014 पासून मार्च 2017 पर्यंत एनपीएचे वाढते प्रमाण पाहता आणखी घोटाळे बाहेर पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात जाणवते. बँकिंग क्षेत्रातील एनपीएचे प्रमाण मार्च2014 मध्ये 2.04 लाख कोटी रुपये एवढे होते, ते मार्च 2017 पर्यंत 10.25 लाख कोटी रुपये एवढे झाले.
सूक्ष्म, छोट्या आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) कर्ज देण्यापासून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना रोखण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या कर्जातही कपात झाली आहे. या बँका रिझर्व बँकेच्या प्रॉम्प्ट करेक्टीव्ह अॅक्शन (पीसीए) अंतर्गत येतात. सध्या पीसीए अंतर्गत येणाऱ्या बँकांची संख्या 11 एवढी आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे आर्थिक सल्लागार सौम्यकांति घोष यांनी सांगितले, की यावर्षी स्ट्रेस्ड अॅसेट्समुळे बँकांना मोठ्या प्रमाणात रकमांची जुळवणी करावी लागणार आहे. जून 2017 मध्ये रिझर्व बँकेने इनसोल्व्हन्सी अँड बँकरप्टसी कोड (आयबीसी) अंतर्गत 12 ाती निश्चित केली होती ज्यांच्याकडे एकूण एनपीएपैकी 25% येणी होती. रिझर्व बँकेने ऑगस्ट महिन्यात त्यात आणखी 28 कंपन्यांचा समावेश केला. चालू वर्षी 30 जूनपर्यंत 32 खाती आयबीसीअंतर्गत दिवाळखोरीसाठी निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.