महादेवाच्या या मंदिरातील नंदीचा आकार वाढत जाणारा !

nandi
नंदी महाराजांची अनुमती मिळाल्याखेरीज महादेवांचे दर्शन मिळत नाही अशी मान्यता आपल्याकडे रूढ आहे. म्हणूनच शिवमंदिराच्या गाभाऱ्यामध्ये नंदीची मूर्ती पहावयास मिळते. भाविक आधी नंदी महाराजांचे दर्शन घेऊन मगच महादेवाच्या दर्शनाला जाताना आपण पाहतो. मग शिवमंदिर लहान असो, किंवा मोठे असो, नंदी महाराजांचे दर्शन आधी घ्यावे लागते. भारतामध्ये एक शिवमंदिर असेही आहे, जिथे असलेल्या नंदीच्या मूर्तीचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे असे म्हटले जाते.
nandi1
पुरातत्वखात्याने देखील या मान्यतेचे समर्थन केले आहे. या नंदीच्या मूर्तीचा आकार इतका झपाट्याने वाढत आहे, की या मूर्तीला जागा पुरी पडावी या करिता मंदिराचे एक-एक खांब हटविण्यात येत आहेत. जे भाविक फार पूर्वीपासून या मंदिरामध्ये येत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार काही वर्षांपूर्वी मंदिरामध्ये दर्शनाला आल्यानंतर गाभाऱ्यामध्ये प्रदक्षिणा घालणे सहज शक्य असे. मात्र आता या मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालण्याइतकी जागा शिल्लकच नसल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. आकार वाढणाऱ्या नंदीची ख्याती ऐकून अनेक पुरातत्ववेत्ते आणि शास्त्रज्ञ मंडळींनी या मूर्तीचे संशोधन सुरु केले असता, दर वीस वर्षांमध्ये या मूर्तीचा आकार काही इंचांनी वाढत असल्याचे निष्पन्न त्यांच्या रिसर्च मध्ये झाले.
nandi2
वैज्ञानिकांच्या मते, मूर्तीचा आकार वाढण्यामागचे रहस्य, ही मूर्ती तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडामध्ये आहे. या मूर्तीसाठी वापरण्यात आलेला दगड विस्तार पावणारा असून, त्यामुळेच मूर्तीचा आकार वाढत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या मंदिराच्या स्थापनेमागे ही रोचक कथा आहे. या मंदिराची स्थापना अगस्त्य ऋषींनी केली असे म्हणतात. खरे तर या ठिकाणी अगस्त्य ऋषींना भगवान व्यंकटेश्वराचे मंदिर बनविण्याची इच्छा होती. मंदिरामध्ये व्यंकटेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना त्या मूर्तीच्या हाताचा अंगठा तुटला. मूर्ती खंडित झाल्यामुळे प्रतिष्ठापना होऊ शकली नाही.
nandi3
त्यानंतर अगस्त्य ऋषींनी तिथेच राहून तपस्या सुरु केली. त्यांच्यावर प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्यांनी अगस्त्य ऋषींना तिथे शिवमंदिर बनविण्यास सांगितले. अगस्त्य ऋषी तपस्या करीत असताना काही कावळे सतत काव-काव करून त्यांच्या तपस्येमध्ये व्यत्यय आणीत होते. त्यामुळे संतापून जाऊन या ठिकाणी कावळे परत कधीच दृष्टीस पडू नयेत असा शाप अगस्त्य ऋषींनी दिला. तेहापासून या मंदिरामध्ये कधीही कावळे दिसत नाहीत असे म्हणतात.

Leave a Comment