उत्तर प्रदेशातील प्रतापगडचे रहिवासी, वर्षातील एक खास दिवसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी प्रतापगड मधील, मालपुआची विक्री करणारे दुकान खुलते. या दुकानामध्ये मिळणारे मालपुअे इतके लोकप्रिय आहेत, की गेल्या साठ वर्षांपासून, वर्षातून एकदाच उपलब्ध होणारे हे मालपुअे खाण्यासाठी लोक वर्षभर आतुरतेने दुकान उघडण्याच्या दिवसाची वाट पाहत असतात.
या दुकानाच्या मालकाचे नाव ओमप्रकाश पालीवाल असून, त्यांच्या गेल्या चार पिढ्यांपासून हे दुकान चालत आले आहे. दरवर्षी केवळ ‘हरियाली अमावास्येच्या’ दिवशी हे दुकान उघडते, आणि अतिशय लोकप्रिय असलेले मालपुअे ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातात. हरियाली अमावास्येच्या दिवशी या दुकानाच्या बाहेर मालपुअे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. याचे कारण म्हणजे या दुकानामध्ये मिळणारे मालपुअे अतिशय चविष्ट तर असतातच, शिवाय वर्षातून एकदाच खुलणाऱ्या दुकानातून आपली आवडती मिठाई खरेदी करून खाण्यातील आनंद ग्राहकांना मनमुराद लुटायचा असतो.
वर्षभरातून एकदाच या दुकानामध्ये मालपुआची विक्रमी विक्री केल्यानंतर या दुकानाला जे कुलूप लावले जाते, ते देखील अतिशय प्राचीन काळी तयार करण्यात आले असून, मागील चार पिढ्यांपासून हेच कुलूप वापरात असल्याचे ओमप्रकाश पालीवाल म्हणतात. मात्र या ठिकाणचे मालपुअे इतके लोकप्रिय असूनही वर्षातून एकदाच हे दुकान का उघडते, यावर ओमप्रकाश यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याने त्यामागे नेमके काय कारण असेल, ते समजू शकले नाही.