नवी दिल्ली : रक्षाबंधन आणि गणेशोत्सव हे दोन महत्त्वाचे सण तोंडावर आले असताना केंद्रातील मोदी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राखी आणि गणेशमूर्त्यांना जीएसटीतून वगळण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी राखी आणि गणेशमूर्त्यांवर जीएसटी लावण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहे. आपल्या परंपरेचा रक्षाबंधन आणि गणेशोत्सव हा हिस्सा असल्यामुळे या परंपरांचा सन्मान करायलाच हवा असेही पियूष गोयल म्हणाले.
महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने मराठी जनतेला केंद्राच्या या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. राखी आणि गणेश मूर्तींना जीएसटी लागू करण्यात येणार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.
जीएसटीमधून राखी, गणेश मूर्ती, हस्तशिल्प, हातमागाच्या वस्तू आदींना वगळण्यात येत असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. लोक गणेशोत्सव आणि रक्षाबंधनच्या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. त्यामुळे या दोन्ही सणांशी संबंधित वस्तुंना जीएसटीतून वगळण्यात आल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या २६ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. तर १३ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे.