ट्रेनला उशीर झाल्यास आयआरसीटीसी प्रवाशांना देणार मोफत जेवण


नवी दिल्ली : रेल्वेने आरक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रेन पाच ते सहा तास उशिराने धावत असेल तर भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगमकडून (IRCTC) जेवण मोफत मिळणार आहे.

यासंदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मीडियाशी चर्चा केली. ते यावेळी म्हणाले की, रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामकाज सध्या सुरु आहे. खासकरुन रविवारच्या दिवशी हे काम सुरु असल्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना उशिर होत आहे. ट्रेनमध्ये असणा-या आरक्षित प्रवाशांची अशा परिस्थितीत खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम (IRCTC) कडून जेवण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासोबतच, विनाआरक्षित तिकिट काढून प्रवास करणा-या नागरिकांसाठी सुद्धा आम्ही मोफत जेवण देण्याचा विचार करत असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. रेल्वेचे नवीन वेळापत्रक येत्या १५ ऑगस्टला आणले जाणार आहे. प्रवाशांना त्यामध्ये रेल्वे ट्रॅकवर चालणा-या नियोजित कामकाजामुळे उशीर होणा-या रेल्वेगाड्यांची माहिती दिली जाणार आहे, असेही पीयूष गोयल म्हणाले.

Leave a Comment