पुरातत्व खात्याला उत्खननात आढळले साडेचार हजार वर्षापूर्वींच्या योद्धा समाजाचे अवशेष


पुरातत्व खात्याच्या उत्खननात उत्तर प्रदेशातील बाघपतमधील सिनौली येथे साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या जीवनशैलीचा उलगडा झाला आहे. प्राचीन काळी भारतीय संस्कृती किती पुढारलेली होती, त्यावेळी नागरीकरण कसे होते, जगातील इतर संस्कृतींच्या एवढी प्राचीन भारतीय संस्कृती आहे का? अशा अनेक प्रश्नांबद्दल अनेक मत व्यक्त होत असतात. पण पुरातत्व खात्याच्या हाती आता लागलेल्या पुराव्यावरून एक गोष्ट निश्चित स्पष्ट होत आहे. भारतामध्ये चार हजार वर्षांपूर्वी रथ होते, तलवारी होत्या, शिरस्त्राण होती, खंजीरासारखी शस्त्रे होती आणि ही सगळी युद्धामध्ये लागणारी शस्रसंपदा तांबे व कास्य धातूंपासून बनवण्याची कला तत्कालिन भारतीयांनी साधली होती.

या जागी गेल्या तीन महिन्यापासून उत्खनन सुरू असून याबद्दलची माहिती नुकतीच पुरातत्व खात्यावे दिली आहे. त्या काळात या भागातील समाज तलवारी व खंजीरांसारख्या गोष्टींवरून योद्धा होते हे स्पष्ट होते. या उत्खननामध्ये एकूण आठ शव पुरण्याच्या जागा आढळल्या आहेत. त्याचबरोबर उत्खननात कला कुसर केलेल्या अनेक वस्तू, तीन शवपेटिका, मोठ्या तलवारी, खंजीर, कंगवे आदी गोष्टी आढळल्या आहेत. तीन रथ शव पुरलेल्या जागी आढळले असून राजघराण्यातील व्यक्तिंच्या दफनाची शक्यता सूचित होत आहे. या ठिकाणी आढळलेल्या सगळ्या गोष्टी तत्कालिन समाज योद्धा होता असे दर्शवतात असे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.