हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या चारधाम पैकी एक जगन्नाथपुरी येथील जगन्नाथाच्या खजिन्याची किल्ली गायब झाली असल्याचे समजते. या खजिन्यात नक्की किती संपत्ती आहे याचे रहस्य कधीच उलगडलेले नाही मात्र येथे मोजता येणार नाही इतके सोने, चांदी, मौल्यवान रत्ने, जवाहीर आहेत असे सांगितले जाते.
हिंदू धर्मियांसाठी आयुष्यात एकदा चारधाम यात्रा करण्याचे महत्व मोठे आहे. पश्चिमेला द्वारका, पूर्वेला जगन्नाथपुरी, उत्तरेला बद्रीधाम आणि दक्षिणेला रामेश्वर अशी हि चारधामे. या ठिकाणी आजही भगवान साक्षात वास करतात असा भाविकांचा विश्वास आहे. जगन्नाथपुरी येथे आजही भगवान श्रीकृष्ण सदेह वास करतात असे सांगितले जाते. दर १२ वर्षांनी येथे नवकलेवर उत्सव साजरा होतो आणि कृष्ण, बलराम आणि सुभद्रा याच्या नव्या मूर्ती विशिष्ठ लाकडातून तयार केल्या जातात. या मंदिराचे वार्षिक उत्पन्न ५० कोटी आहे आणि मंदिराची मालमत्ता २५० कोटींचे आहे मात्र यात खजिन्यातील सम्पतीचा समावेश नाही.
असे म्हणतात कि या मंदिराची जितकी उंची आहे तितक्याच खोल जागेत खजिना आहे. यात सोने, चांदी, रोकड, दागदागिने, रत्ने असा मौल्यवान माल आहे. याला रत्नभांडार असे म्हणतात. ओडीसा हायकोर्टने ४ एप्रिल रोजी कडक सुरक्षेत १६ सदस्यांच्या एका पथकाला या खजिन्याची तपासणी करण्यासाठी पाठविले होते. ३४ वर्षांनी अशी तपासणी केली गेली. मात्र या सदस्यांना खजिन्यात जे दिसेल त्याविषयी कुठेही बाहेर काही बोलणार नाही अशी शपथ लोकनाथ मूर्तीजवळ घ्यावी लागली होती. खजिना ठेवलेल्या पेट्या उघडण्याची परवानगी त्यांना नव्हती तर खजिन्याच्या खोल्या खराब झाल्या नाहीत ना इतकीच पाहणी त्यांना करायची होती. या तपासणी नंतर दोन महिन्यांनी रत्नभांडाराची किल्ली हरविल्याचे लक्षात आले आहे. हि किल्ली कुठे असावी याचे रहस्य अद्यापि उलगडलेले नाही.