
जबरदस्त भूक लागली, की जे समोर येईल ते, आणि जश्या स्वरूपात असेल तसे खाण्याकडे आपला कल असतो. आजकाल जेवताना देखील आपल्याला डोळ्यांसमोर टीव्ही किंवा मोबाईल फोन हवा असतो. त्याच्याकडे पाहता पाहता आपण काय जेवतो आहोत, कसे जेवतो आहोत ह्याकडे बहुतेकवेळी आपले लक्ष नसते. दुपारच्या वेळचे भोजन जर कामाच्या ठिकाणी असेल, तर ते देखील घाई-घाईतच उरकले जात असते. पण खरे म्हणजे आपल्या शास्त्रांमध्ये अन्नप्राशन कशा प्रकारे केले जावे ह्याबाबत काही निश्चित नियम सांगितले गेले आहेत. ह्या नियमांचे पालन करून भोजन केले गेले असता, ते भोजन आरोग्यवर्धक ठरते, तसेच ह्यामुळे पचनतंत्राशी निगडीत तक्रारी उद्भविण्याची शक्यता कमी असते.

आपल्या शास्त्रांमध्ये अन्न हे पूर्णब्रह्म मानले गेले आहे. त्यामुळे त्या अन्नाचा कोणत्याही प्रकारे अनादर होणे इष्ट नाही. त्यासाठी अन्नप्राशनाचे काही ठराविक नियम आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेले आहेत. सर्वप्रथम, स्नान न करता अन्नप्राशन करणे निषिद्ध मानले गेले आहे. ज्या व्यक्ती मुखसंमार्जन न करता किंवा स्नान न करता अन्नप्राशन करतात, त्यांच्या जीवनामध्ये नेहमी आर्थिक अडचणी येत असतात अशी मान्यता आहे.

तसेच अश्या व्यक्तींच्या घरामध्ये अन्नधान्याची सदैव उणीव रहात असून त्या व्यक्तींचे स्वास्थ्य देखील चांगले राहत नाही अशी समजूत आहे.
शास्त्रांच्या नुसार जमिनीवर बसून मांडी घालून भोजन करणे सर्वोत्तम मानले गेले आहे. तसेच बिछान्यावर, किंवा खुर्चीवर बसून भोजन करणे निषिद्ध मानले गेले आहे. धार्मिक दृष्ट्या विचार करायचा झाला, तर भोजन बनविले गेल्यानंतर त्याचा एक भाग गायीला देण्याची पद्धत प्राचीन काळामध्ये रूढ होती. आता गोग्रास बाजूला काढणे शक्य नसल्यामुळे देवाच्या नावाने एक घास बाजूला काढून आपल्याला मिळत असलेल्या पोटभर अन्नासाठी देवाचे आभार मानावेत अशी मान्यता आहे. त्यानंतर भोजन सुरु करावे.

आपण जमिनीवर बसून जेवत असताना अन्नाचे काही कण ताटाच्या बाहेर सांडतात. जेवण झाल्यानंतर हे सांडलेले अन्न गोळा करावयास हवे, अन्यथा ते कोणाच्या पायाखाली येण्याची शक्यता असते. अन्न पायी तुडविले जाणे धार्मिक दृष्ट्या निषिध्द मानले गेले आहे. सांडलेले अन्न गोळा करून पक्षी खातील अश्या ठिकाणी ठेवावे, किंवा झाडांमध्ये घालावे. तसेच काही लोकांना आपल्या भुकेपेक्षा जास्त अन्न वाढून घेण्याची सवय असते. त्यानंतर पोट भरल्याने हे अन्न खाल्ले जात नाही, व वाया जाते. अश्या प्रकारे अन्नाची नासाडी करणे देखील शास्त्रांच्या नुसार निषिद्ध मानले गेले आहे. जेवायला बसताना थोडे थोडे अन्न वाढून घ्यावे, आणि लागले तर परत वाढून घ्यावे, पण शक्यतो अन्न पानामध्ये टाकून देऊ नये. पानामध्ये अन्न टाकल्यास घरातील लक्ष्मी रुष्ट होते अशी समजूत आहे. तसेच जेवताना उभ्या उभ्या जेवणे, पादत्राणे घालून जेवणे निषिद्ध मानले गेले आहे.

आजकाल बाहेर जेवायला जाताना ह्या गोष्टींचे पालन करणे शक्य नसले तरी घरी भोजन करीत असताना ह्या नियमांचे पालन अवश्य करावे.
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या एका शोधानुसार जेवल्यानंतर त्वरित झोपणे, व्यायाम करणे, त्वरीत घराबाहेर पडणे, धुम्रपान करणे ह्या गोष्टींमुळे शरीरामध्ये अनेक तऱ्हेच्या व्याधी उत्पन्न होऊ शकतात. तसेच अपचन, पोटफुगी, गॅसेस, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, मळमळणे इत्याधी तक्रारी उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे भोजन करताना पाणी पिऊ नये. भोजनाच्या अर्ध्या तासाच्या नंतर पाणी प्यावे. जर भोजन करताना ठसका लागला, तर एक दोन घोट पाणी प्यावे. त्याचप्रमाणे फ्रीजमध्ये ठेवलेले, तीन चार दिवसांपूर्वीचे शिजविलेले अन्नही खाण्यास योग्य नाही. ह्याद्वारे अनेक तऱ्हेचे बॅक्टेरिया किंवा व्हायरस शरीरामध्ये शिरण्याची शक्यता असते. तसेच रात्रीचे भोजन आणि झोप यांमध्ये किमान दोन तासांचे अंतर असणे अगत्याचे आहे.
