‘या’ रेल्वे स्थानकाचा एक भाग महाराष्ट्रात, तर दुसरा गुजरातमध्ये !


ही हकीकत आहे अश्या एका रेल्वे स्थानकाची, जे गुजरात आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांमध्ये विभागलेले आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ह्या दोन्ही सीमांच्या हद्दीत असणारे हे एकमेव रेल्वे स्थानक आहे. ह्या स्थानकावरील एक बाक असा आहे, ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आहे, तर उर्वरित अर्धा भाग गुजरातमध्ये आहे. ह्या बाकावर बसणाऱ्यांना, ते कुठल्या राज्यात बसले आहेत ह्याकडे लक्ष द्यावे लागते. इथे तिकीट खिडकी महाराष्ट्रामध्ये आहे, तर स्टेशन मास्तरांचे ऑफिस गुजरातमध्ये आहे. इतकेच नाही, तर ह्या स्टेशनवर अनाउन्समेंट चार निरनिराळ्या भाषांमध्ये होत असतात. ह्या स्टेशनचे नाव आहे ‘नवापर’.

नवापर रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकी, रेल्वे पोलीस स्थानक, केटरिंग, महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर गावामध्ये येतात, तर स्टेशन मास्तरांचे कार्यालय, वेटिंग रूम, पाण्याची टाकी, आणि शौचालय गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यामध्ये येतात. ह्या स्टेशनवर येणाऱ्या रेल्वे गाड्यांचा देखील अर्धा भाग गुजरातेत, तर अर्धा भाग महाराष्ट्रात असतो. ह्या रेल्वे स्टेशनचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या स्टेशनसाठी लागू असलेले दोन वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे नियम. गुजरातमध्ये मद्यविक्रीवर बंदी आहे, तर महाराष्ट्रामध्ये पान मसाला आणि गुटखा विक्रीवर बंदी आहे. त्यामुळे स्टेशनच्या गुजरातमधील भागामध्ये गुटखा आणि पानमसाल्याची विक्री बेकायदेशीर मानली जात नाही. त्याचप्रमाणे स्टेशनच्या महाराष्ट्रातील भागामध्ये मद्याची विक्री बेकायदेशीर नाही.

हे रेल्वे स्थानक पश्चिम विभागाच्या सूरत-भुसावळ मार्गावर असून हा दुहेरी विद्युत मार्ग आहे. ह्याचा सर्वाधिक लाभ सूरत मधील व्यापाऱ्यांना माल पाठविण्या-आणण्याच्या दृष्टीने होत असतो. सूरतमध्ये हिरे तसेच कपड्याची मोठी बाजरपेठ आहे. ह्या स्थानकावर दिवसभरात सुमारे दोनशे गाड्यांचे आवागमन होत असते. हे स्थानक अतिशय स्वच्छ असून, ह्याला स्वच्छतेसाठी अनेक पारितोषिके मिळाली आहेत. ह्या स्टेशनवरून प्रवासी ट्रेन्सच्या मानाने मालवाहू ट्रेन्सची ये-जा जास्त प्रमाणात पाहायला मिळते. कधी ह्या स्टेशनावर कोणती दुर्घटना घडली, तर त्याचा तपास कोणी करायचा ह्यावर दोन्ही राज्यांच्या पोलीस खात्यांमध्ये अनेकदा वादही होत असल्याचे समजते. उदाहरणार्थ ट्रेन खाली येऊन कोणाचा अपघाती मृत्यू झाला, तर त्याचे तपासकार्य कोणी करायचे ह्यावर दोन्ही पोलीस खात्यांमध्ये दुमत असते. असेच अनेकदा गुन्हेगार गुन्हा करून ह्या राज्यातून त्या राज्यात पलायन करीत असल्याने येथे पोलीस आणि गुन्हेगारांच्या मध्ये चाललेला पाठशिवणीचा खेळ ही पाहायला मिळतो.

Leave a Comment