भारताचे नवे फोटो ‘नासा’कडून प्रसिद्ध


वॉशिंग्टन : गेल्या दहा दिवसातील भारताचे काही फोटो ‘नासा’ने प्रसिद्ध केले असून, देशातील अनेक भागात आगीचे लोण पसरल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे. ‘नासा’ने प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह दक्षिण भारतातील अनेक राज्यात आगीचे लोण पसरलेल्याचे दिसत आहे.

वातावरणात ब्लॅक कार्बनचे प्रमाण या आगींमुळे मोठ्या प्रमाणात वाढले असून, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण वाढीत त्यामुळे भर पडली आहे. विशेष म्हणजे, आगीच्या भक्षस्थानी पडलेला सर्वाधिक भागात जंगल असल्याचे सांगितले जात आहे. पण हा दावा ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी फेटाळला आहे. वैज्ञानिकांच्या मते, आगीचे लोण ज्या भागात दिसत आहेत. त्यापैकी सर्वाधिक भागात शेतजमीन असल्याचे सांगितले आहे. जंगलात पेटलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळवणे अशक्य असते. तसेच, वातावरणात या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोळ आणि धुके पसरत असल्याचेही वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे कृषी तज्ज्ञांच्या मते, शेतमजुरांची मजुरी गेल्या काही वर्षात वाढल्याने, हार्वेस्टरचा वापर वाढला आहे. त्यामुळे पिकांच्या कापणीनंतर पिकांचा खालचा भाग मुळासकट काढून टाकण्यासाठी आग लावली जाते. जे फोटो ‘नासा’ने प्रसिद्ध केले आहेत, त्या भागात तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.

Leave a Comment