पवित्र कैलास पर्वताजवळचे राक्षस ताल सरोवर


कैलास पर्वताची यात्रा हिंदू आणि जैन भाविकांसाठी अति पवित्र यात्रा मानली जाते. या मार्गावर लागणारे मानसरोवर हा यात्रेचा महत्वाचा टप्पा मनाला जातो आणि या सरोवरात भाविक कडाक्याच्या थंडीतही स्नान करण्याचे पुण्य मिळवितात. कैलास पर्वताजवळ राक्षसताल नावाचेही सरोवर आहे मात्र यात कुणीही स्नान करत नाही कारण या सरोवरात स्नान केले तर बुद्धी भ्रष्ट होते असा समज आहे.


यामागे अशी कथा सांगतात कि लंकेचा राजा रावण अतिविद्वान, उत्तम प्रशासक आणि प्रतिभाशाली होता. तो शिवभक्त होता. त्याने कैलास पर्वताजवळ शिवाची उपासना केली तेव्हा या सरोवरात अगोदर स्नान केले होते. येथे शेजारीच असलेले गौरी कुंड हे पार्वतीचे स्नानस्थळ होते. येथे रावणाची नजर पार्वतीवर पडली. रावणाच्या उपासनेने प्रसन्न झालेल्या महादेवानी जेव्हा रावणाला काय हवे असे विचारले तेव्हा रावणाने तुमची पत्नी पार्वती द्या अशी मागणी केली. सरोवरात स्नान केल्याने रावणाची बुद्धी भ्रष्ट झाली व त्यामुळे त्याने अशी मागणी केली असा समज आहे.

या सरोवरात स्नान न करण्यामागे वैज्ञानिक कारणही दिले जाते. या सरोवरात काही घातक नैसर्गिक वायू पाण्यात मिसळले आहेत. त्यामुळे हे पाणी काहीसे विषारी झाले आहे. यात स्नान केल्याने मृत्यूचा धोका नाही पण त्या पाण्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात म्हणून येथे स्नान केले जात नाही असे सांगितले जाते.

Leave a Comment