२०१७मधील या घटनांनी उंचावली भारताची मान


सध्या आपल्याला नव्या वर्षाची चाहूल लागली असली तरी सरत्या वर्षाने आपल्याला काय काय दिले, म्हणून एकदा तरी २०१७कडे दृष्टिक्षेप टाकायला हवा. अशा अनेक घटना या वर्षात घडल्या ज्यामुळे भारताची मान जगात उंचावली. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत २०१७मधील अशा घटना ज्यामुळे भारताची मान भारताची मान जगात उंचावली.

२०१७मध्ये तब्बल ११८ देशांमधील तरुणींचा सामना करत हरियाणाच्या मानुषी छिल्लर या तरुणीने मिस वर्ल्डचा किताब पटकावला. हा मान भारताकडे १७ वर्षांनी परत आला. अंतिम फेरीत देताना मानुषी जगात सगळ्यात जास्त पगार कोणाला मिळायला हवा? या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाली, सगळ्यात जास्त पगार खर तर आईला मिळायला हवा. परीक्षकांची मने तिच्या उत्तराने तिने जिंकली होती आणि मिस वर्ल्डचा मुकुटही तिने भारतासाठी जिंकला. २०वर्षांची मानुषी मेडिकलची विद्यार्थिनी आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ती सहावी भारतीय तरुणी आहे.

भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने या वर्षी एका दिवसात एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल १०४ उपग्रह अंतराळात सोडत इतिहास घडवला. ‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या यशाशी नेटकऱ्यांनी या पराक्रमाची तुलना केली.
१५ फेब्रुवारी २०१७ला हे १०४ उपग्रह घेऊन आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरीकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटर मधून एक रॉकेट आकाशात झेपावले. यापैकी ३ उपग्रह भारताचे होते, तर उर्वरित १०१ उपग्रह अमेरिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इस्राईल, कझाकस्तान आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचे होते. इस्रोच्या या पराक्रमाआधी रशियाने सर्वाधिक म्हणजे ३७ उपग्रह आकाशात सोडले होते.

दंगल आणि बाहुबली या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनी २०१७ हे वर्ष गाजवले. २०१६च्या डिसेंबरमध्ये दंगल रिलीज झाला होता. तरीही या चित्रपटाने २००० कोटी रुपयांचा गल्ला जमवला तो याच वर्षात! हा चित्रपट जगभरात नावाजला गेला. त्या खालोखाल एस. राजमौली यांच्या ‘बाहुबली’ने भारतातील बॉक्स ऑफिसचे सगळे विक्रम मोडीत काढले. या चित्रपटाने एकट्या भारतात १४०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

याचवर्षात भारतीय नौदलात पायलट म्हणून नियुक्ती होणाऱ्या शुभांगी स्वरूप या पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत. ‘मॅरिटाइम रेकनन्स एअरक्राफ्ट’चे सारथ्य मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या शुभांगी करतील. याव्यतिरिक्त पहिल्यांदाच तीन महिला अधिकाऱ्यांची नौदलाची उपशाखा असणाऱ्या ‘नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टरेट’ विभागात नियुक्ती झाली आहे.

भारत आणि क्रिकेटचे नाते काही खासच आहे. २०१७मध्ये हे नातं आणखीनच वेगळ्या पातळीवर पोहोचले. भारताने या वर्षात कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारांमध्ये आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. भारताची एकाच वेळी दोन्ही प्रकारांमध्ये अव्वल स्थान पटकावण्याची ही पहिली वेळ आहे. त्याचबरोबर अंधांसाठी असलेला टी-२० विश्वचषक वर्ल्डकप यंदा भारतीय टीमने जिंकला. भारताच्या किदांबी श्रीकांतने बॅडमिंटनमध्ये एका वर्षात चार सुपर सिरीज जिंकण्याचा पराक्रम करत इतिहास घडवला. श्रीकांत इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये अजिंक्य ठरला.

फुटबॉल विश्वकपचे आयोजन क्रिकेटवेड्या भारतात होणे, ही कल्पनाच भन्नाट होती आणि ती कल्पनाही २०१७ने साकार करून दाखवली. यंदा भारतात अंडर-१७ फिफा वर्ल्डकप रंगला आणि देशभरातील तब्बल १३.५ लाख लोकांनी या विश्वचषकाचा आनंद लुटला. हा फुटबॉल विश्वचषक जरी भारताला जिंकता आला नसला तरी, केवळ यजमानपद मिळाल्याने भारतीय तरुणाईचा आनंद गगनात मावेनासा झाला.

ऑगस्ट २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतातील मुस्लीम महिलांना दिलासा देणारा एक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच पैकी तीन न्यायमूर्तींनी मुस्लीम समाजात प्रचलित असलेली ट्रीपल तलाकची पद्धत घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिला. सरकारने ही पद्धत पूर्णपणे बंद करण्याऐवजी कायदा करेपर्यंत सहा महिने त्यावर बंदी घालावी, असे मत इतर दोन न्यायमूर्तींनी दिले. केंद्रीय न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी २८ डिसेंबर २०१७ रोजी संसदेत तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारे विधेयक मांडले आणि लोकसभेने ते विधेयक पास करत आता राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.

तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण व्हावे, या दृष्टीने या वर्षात अनेक प्रयत्न झाले. भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर न्यायाधीश म्हणून पश्चिम बंगालच्या ज्योइता मोंडल यांची नियुक्ती झाली. ‘तामिळनाडू युनिफॉर्म सर्व्हिसेस रिक्रूटमेंट बोर्ड’च्या निर्णयाला तामिळनाडूच्या प्रीतिका अश्नी यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्या त्यानंतर पहिल्या पोलीस उपनिरीक्षक बनल्या. तसेच भारतात पहिल्यांदाच कोचीच्या मेट्रोमध्ये २३ ट्रान्सजेंडरना एकाच वेळी नोकरी देण्यात आली.

Leave a Comment