जिओ संदर्भात बोलताना शाहरुखकडून झाली गफलत


मुंबई : दिवसेंदिवस मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या वाढतच असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. जिओच्या ग्राहकांची संख्या आतापर्यंत १६ कोटींवर पोहोचली असून २३ डिसेंबर रोजी यासंदर्भातील माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याने दिली आहे. आकाश आणि ईशा अंबानीसोबत या कार्यक्रमात अभिनेता शाहरुख खानही उपस्थित होता.

मात्र, अभिनेता शाहरुख खान याच्याकडून कार्यक्रमादरम्यान एक मोठी चूक झाली आणि आकाशने ही चूक त्याच्या लक्षात आणून दिली. शाहरुख खान याने या कार्यक्रमात बोलताना म्हटले की, आतापर्यंत १० कोटींवर जिओच्या ग्राहकांची संख्या पोहोचली आहे. त्यानंतर आकाशने लगेचच शाहरुखला ‘१६ कोटी शाहरुख’ अशी आठवण करुन दिली.

सप्टेंबर २०१६मध्ये आपल्या ४जी सेवेची रिलायन्स जिओने सुरुवात केली. कंपनीची वॉईस कॉलिंग आणि एसएमएस सेवा संपूर्णपणे मोफत आहे. रिलायन्स जिओच्या धमाकेदार ऑफर्समुळे बाजारातील इतर कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

२३ डिसेंबर रोजी रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला ४० वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो कर्मचारी, अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या मुकेश अंबानी यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना आपल्या आगामी योजनांवर प्रकाश टाकला.

Leave a Comment