गुगलची भारतातील पहिल्या महिला छायाचित्र पत्रकाराला आदरांजली


मुंबई : त्या महिलांसाठी आजचा दिवस प्रचंड महत्त्वाचा असून छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नालिजम) ज्या करित आहेत. जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगललाही अगदी आजच्या दिवसाचे महत्त्व माहिती आहे. गुगलने म्हणूनच डूडलच्या माध्यमातून होमी व्यारवाला यांच्या आठवणी जागवल्या आहेत. भारतातील पहिल्या छायाचित्र पत्रकार (फोटो जर्नालिस्ट) होमी व्यारवाला या होत्या.

९ डिसेंबर १९१३ला होमी व्यारवाला यांचा जन्म तर, मृत्यू जानेवारी २०१२मध्ये झाला. त्या मृत्यू समयी ९८ वर्षांच्या होत्या. गुजरातमधील नवसारी येथील पारसी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. उर्दू थियेटरमध्ये त्यांचे वडील अभिनेता होते. आज महिला फोटो पत्रकार म्हणून आपले करिअर करणाऱ्या होमी व्यारवाला यांची १०४वी जयंती आहे. पत्रकारितेतील व्यारवाला यांचे कार्य हे मैलाचा दगड आहे. याचे कारण ज्या काळात त्यांनी पत्रकारिता विशेषत: छायाचित्र पत्रकारिता सुरू केली तो काळ पारतंत्र्याचा तर होताच. पण, सामाजिक बंधने इतकी घट्ट होती की, पत्रकारिताच नव्हे तर, इतर कोणत्याही क्षेत्रात महिलांनी काम करणे हे केवळ कठीणच नव्हे तर, अशक्य कोटीतील बाब होती.

मुंबईशी भारतातील पहिला छायाचित्र पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होमी व्यारवाला यांचे खास घनिष्ठ नाते होते. कारण त्यांची छायाचित्रकलेचे शिक्षण आणि जडणघडण मुंबईत झाली. मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी आपले शिक्षण घेतले. रॉलिफ्लेक्स हा त्यांचा आवडता कॅमेरा होता. १९३० ते १९७० या काळात त्यांच्या पत्रकारितेचा बहराचा काळ होता. त्यांनी आपल्या एकूण पत्रकारितेत ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ छायाचित्रे काढण्यास प्राधान्य दिले.

समग्र भारताच्या इतिहासात १९४७ हे साल अत्यंत महत्त्वाचे. भारत इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्याच्या शृंखला तोडून स्वतंत्र झाला. देशभरात हा आनंद साजरा करण्यात आला. व्यारवालांच्या चौकस नजरेतून आणि कॅमेऱ्यातून या क्षणाचे ऐतिहासिक क्षण सुटले असते तरच नवल. व्यारवालांनी हे दुर्मिळ आणि तितकेच महत्त्वाचे क्षण अचूक टीपले आहेत. त्यांची छायाचित्रे पहिल्यांदा बॉम्बे क्रॉनिकलमध्ये प्रकाशित झाली. विशेष असे की, या छायाचित्रांचे त्यांना प्रत्येकी एक रूपया इतके मानधन मिळत असे. आपल्या पतीसोबत दिल्लीला आलेल्या व्यारवाला यांनी ब्रिटीश सूचना सेवा कर्मचाऱ्याच्या रूपात भारतीय स्वातंत्र्याचे ते क्षण टीपले.

तब्बल ४० वर्षे अथक पत्रकारिता करणाऱ्या या अवलिया महिला पत्रकाराने १९७०मध्ये आपल्या छायाचित्रकारितेला अलविदा म्हटले. त्यांच्या पतींचे १९७०मध्ये निधन झाले. या धक्क्यातून सावरताना त्या छायाचित्रकारितेतून बाजूला झाल्या. त्यांना भारत सरकारने २०११मध्ये पद्म विभूषण पूरस्काराने सन्मानित केले.

Leave a Comment