
मुंबई – एसएमएस, ईमेल आणि फोन कॉलवरून विविध स्वरुपाची आमिषे दाखवून दैनंदिन व्यवहारात लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे आपण ऐकले किंवा वाचले असेलच पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच यावर उपाय म्हणून ‘सुनो आरबीआय क्या कहता है’ ही जनजागृती मोहीम चालवणार आहे. आरबीआयने हा निर्णय लोकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी घेतला आहे.
लोकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी आरबीआयची मोहीम
आरबीआय या मोहिमेंतर्गत लोकांना फसव्या ऑफर्सपासून वाचविण्यासाठी एसएमएसच्या माध्यमातून सजग करेल. याबाबत माहिती देताना आरबीआयने म्हटले आहे, की लोकांचे फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी यापूर्वीही आरबीआयने प्रेस रिलीज काढले आहे. आरबीआय आता एसएमएसच्या माध्यमाने लोकांमध्ये जनजागृती करणार आहे, आरबीआयची अशा पद्धतीने जनजागृती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. लोकांना बँकांचे नियम आणि सुविधांच्या संदर्भात माहिती या माध्यमातून देण्यात येईल.
