जागतिक आरोग्य संघटनेमुळे भारतातील क्षयरोगाचे भीषण वास्तव आले समोर


नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामुळे भारतात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण असल्याची आकडेवारी समोर आली आहे. तब्बल २७ लाख ९० हजार भारतातील क्षयरोगग्रस्तांची संख्या असून ४ लाख २३ हजार जणांना २०१६ मध्ये क्षयरोगामुळे प्राण गमवावा लागल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्यामुळे क्षयरोगाचे भारतातील भीषण वास्तव समोर आले आहे.

जगभरात २०१६ मध्ये क्षयरोगाचे १ कोटीहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. केवळ ७ देशांमध्ये यातील ६४ टक्के रुग्ण आढळून आले. भारत यामध्ये पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर इंडोनेशिया, चीन, फिलिपिन्स, पाकिस्तान, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. पुरेशी जागरुकता क्षयरोगाबद्दल नसल्याने रोगाचे निदान होण्यास लागणारा वेळ आणि त्यानंतरही न मिळणारे उपचार यामुळे क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात नमूद केले आहे.

क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या ‘२०१६ मध्ये १ कोटी ४ लाखाने वाढल्याचा अंदाज आहे. पण केवळ ६३ लाख जणांना क्षयरोग झाल्याची अधिकृत नोंद उपलब्ध असल्यामुळे ४४ लाखांची तफावत अंदाज आणि अधिकृत आकड्यामध्ये आहे. यातील निम्मे रुग्ण भारत, इंडोनेशिया आणि नायजेरियामध्ये आढळून येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात म्हटले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment