‘ ही ‘ आहेत जगातील शापित ठिकाणे


भूतांनी झपाटलेली, एकाकी, भयावह वातावरण असल्याने अंगावर भीतीचा काटा उभा करणारी ठिकाणी आपण फक्त चित्रपटांमध्ये पाहतो. पण या जगामध्ये खरोखरच अशी काही ठिकाणे आहेत जी शापित असल्याचे म्हटले जाते. अश्या जागांचे पर्यटकांना मात्र अतिशय आकर्षण वाटते. चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी अश्या शापित समजल्या जाणाऱ्या काही ठिकाणांना काही हौशी पर्यटक आवर्जून भेट देत असतात. पण या जागा आणि त्यांच्याशी निगडीत कथा इतक्या विचित्र आणि भयावह आहेत, की स्वतःला बहाद्दर म्हणवणाऱ्यांनाही ही ठिकाणे अस्वस्थ करून सोडतात.

स्कॉटलंडमधील एडीम्बराचा राजवाडा शापित असल्याचा समज आहे. या राजवाड्याचा इतिहास निर्घृण हत्या, आणि रक्तपाताने भरलेला आहे. या राजवाड्यामध्ये कोणत्यातरी अमंगल शक्तीचा प्रभाव असल्याचे म्हटले जाते. येथे येणाऱ्या पर्यटकांना सतत चित्रविचित्र अनुभव येतात. कोणीतरी आपल्याला पकडून ठेवत आहे, किंवा कोणीतरी जोराने ढकलून दिल्यासारखे वाटल्याचे ही अनेक पर्यटक म्हणतात. तर काही पर्यटकांनी निरनिराळ्या आकृती भटकताना पाहिल्याचे ठामपणे सांगितले आहे. या राजवाड्यातील वातावरण ही अतिशय उदास आणि अस्वस्थ करणारे आहे.

इंग्लंडमधील ‘ एन्षीयंट रॅम ईन ‘ नावाचे हॉटेल ११४५ साली बनविले गेले. येथे प्रवाशांकरिता रात्रभर राहण्याची व जेवणाची सोय केली जात असे. हे हॉटेल ज्या ठिकाणी बांधले गेले, त्या ठिकाणी एक प्राचीन दफनभूमी होती. त्या दफनभूमीवर हे हॉटेल बांधले गेल्याने त्या हॉटेल मध्ये अनेक आत्म्यांचा वास असल्याची आख्यायिका प्रचलित होती. १९६८ साली जॉन हम्फ्रीस नावाचा इसम या हॉटेल चा मालक होता. एका रात्री तो आपल्या बिछान्यात झोपलेला असताना कोणी तरी त्याला बिचाण्यातून ओढून काह्ली जमिनीवर पाडले. जॉन ला आपल्या जवळपास कोणीतरी आहे हे काळात होते, पण दिसत मात्र कोणीच नव्हते. हे हॉटेल आजही शापित समजले जाते.

चेक रिपब्लिक मधील प्राग येथे असणारे सेंट अॅग्नेस कॉन्व्हेंट हे चर्चही शापित समजले जाते. १२३१ साली ह्या चर्च चे निर्माण करण्यात आले होते. या ठिकाणी जादूटोणा केला जात असल्याच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. येथे राहणाऱ्या एका नन ची हत्या करण्यात आल्यानंतर आज ही ती नन येथे येणाऱ्या लोकांच्या दृष्टीस पडते असे येथील स्थानिक रहिवासी सांगतात. तसेच आयर्लंड मधील अचील आयलंड येथे सुमारे शंभर दगडी घरे आहेत, पण येथे मनुष्यवस्ती नाही. फार पूर्वी या दगडी घरांमध्ये शेतमजूर आणि त्यांचे परिवार रहात असत. पण पुढे भयंकर दुष्काळ पडल्याने अन्नाअभावी पुष्कळ जीवितहानी झाली. त्यामध्ये हे शेतमजूर आणि त्यांचे परिवारही दगावले. त्यांचाच वास आज ही या ठिकाणी आहे अशी आख्यायिका आहे.

इंडोनेशिया या देशामधील लावांग सेवू ही इमारत डच लोकांनी बांधली होती. १९४५ साली जपानी सैन्याने ही इमारत ताब्यात घेऊन त्यांचे कारागृहात रूपांतर केले. या ठिकाणी अनेक कैद्यांना भयंकर यातना दिल्या गेल्या, कित्येकांची हत्या केली गेली. त्या कैद्यांची भुते आजही या ठिकाणी आहेत असे म्हणतात. इंडोनेशिया या देशामधील ही सर्वात भयानक आणि शापित वास्तू समजली जाते. पण ही वास्तू बघून एखाद्या तरी भुताचे दर्शन होईल या आशेने भरपूर हौशी पर्यटक येथे गर्दी करीत असतात.

Leave a Comment