भारताचा टॉमेटो पाकिस्तानला झाला ‘नकोसा’


नवी दिल्ली – पाकिस्तान सध्या टॉमेटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलो झाले असले तरीही पाकिस्तानने भारताकडून टॉमेटो आयात करणार नाही, अशी भूमिका घेतली असल्याची माहिती पाकिस्तानचे अन्न सुरक्षा मंत्री सिकंदर हयात बोसान यांनी दिली आहे.

यासंदर्भातील वृत्त एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून टॉमेटोची पाकिस्तानच्या बाजारात आयात कमी होत असल्यामुळे प्रतिकिलो ३०० रुपये दराने देशातील अनेक भागांत टॉमेटो विकला जात आहे. दरवर्षी भारताकडून टॉमेटोची पाकिस्तान आयात करतो. पण भारताकडून यावर्षी टॉमेटो आयात करणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. सीमेपलिकडून येणाऱ्या कंटेनरना देशात प्रवेश दिला जात नसल्यामुळे मागणी असूनही त्या तुलनेत पुरवठा होत नाही, असेही वृत्तात म्हटले आहे. आता फक्त सिंध प्रांतातील उत्पादित मालाची प्रतीक्षा येथील स्थानिक व्यापाऱ्यांना आहे.

येत्या काही दिवसांतच पाकिस्तानातील टॉमेटो आणि कांद्याच्या तुटवड्याचे संकट संपेल. लवकरच बलुचिस्तानमधून माल बाजारात येईल, अशी आशा मंत्री बोसन यांनी व्यक्त केली. आपण भारताकडून भाज्या आयात करणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

Leave a Comment