मुंबई – मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी करून ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनातून बाद केली होती. पण आता एका सर्वेक्षण अहवालातून १००० रुपयांची नोट पुन्हा चलनात आणण्यात यावी, अशी देशातील सुमारे ७० टक्के नागरिकांची इच्छा असल्याची बाब समोर आली आहे.
देशातील ७० टक्के लोकांना चलनात पुन्हा हवी आहे १००० रुपयांची नोट!
केंद्रातील मोदी सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ५०० आणि १००० रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. मार्च २०१६ पर्यंत चलनात असलेल्या एकूण १६.२४ ट्रिलियन किंमतीच्या नोटांपैकी रद्द करण्यात आलेल्या नोटांची संख्या ८६ टक्के ऐवढी होती. बँकांमध्ये नोटांबंदीनंतर रद्द केलेल्या ९९ टक्के नोटा पुन्हा जमा झाल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच दिली होती.
याबाबत हैदराबादमधील ‘Way2Online’ या स्थानिक न्यूज अॅपने सर्वेक्षण केले आहे. या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या दाव्यानुसार, रिझर्व्ह बँकेने ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा नोटाबंदीनंतर जरी बाजारात आणल्या असल्या तरी, सुट्टे चलन उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत, असे सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ६२ जणांनी म्हटले आहे. मात्र, ३८ जणांनी आम्हाला सुट्या पैशांअभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे. देशातील सर्वाधिक नागरिक कमी मूल्याच्या नोटांचा वापर दैनंदिन व्यवहारात करतात. त्यामुळे त्यांनी कमी मूल्याच्या नोटा चलनात असाव्यात, असे मत व्यक्त केले आहे.