चला जावू या बर्कीला

barkiबालवयापासूनच पावसाच मानवी मनाला आकर्षण वाटत आलं आहे.पाऊस म्हणजे जीवन. सृष्टीला पाऊस मोहरुन टाकतो.जीवसृष्टी नव्याचा आनंद घेते.निसर्गसुध्दा या पावसाची वाट पहातच असतो. त्याचे आगमन होताच डोंगरदर्‍यांमध्ये पडणारा धुवाँधार पाऊस,त्यामुळे डोंगरकपारीमधील छोटय़ा-मोठय़ा कपारीमध्ये निर्माण होणारे ओहोळ आणि हे ओहळ कोसळल्यामुळे त्याचे झालेले धबधब्यातील रुपांतर, त्याचा झुळझुळणारा खळाळत जाणारा आवाज आपल मन गुंतवून टाकतो आणि हे पाणी सर्व डोंगरदर्‍यांना हिरवा शालू कधी लपेटून देतो ते आपल्याला कळतच नाही. असा हा सुंदर कोल्हापूरचा निसर्ग पर्यटकांना साद घालत आहे.

कोल्हापूरनगरी महालक्ष्मीचे अधिष्ठान, शिवरायांची स्नुषा ताराराणी त्यांनी स्थापन केलेली मराठय़ाची ही नगरी म्हणजे कोकण आणि घाट माथा यांचा सुंदर संगम आहे.पर्यटकांना भुरळ घालतील अशा अनेक स्थळांचं आगर या जिल्ह्यात आपणाला येण्याचा आग्रह करीत आहे. अशाच एका पावसाळी पर्यटन स्थळास नुकतीच भेट देण्याचा प्रसंग आला.


निसर्गाची ओढ मानवी मनाला नेहमीच भुरळ घालत आलेली आहे. पावसाळ्यात तर निसर्गाचे सौंदर्य नेहमीच खुलते. हिरवाई, ऊन-पावसाचा लंपडाव, येणारी एखादी सर, गवताच्या पात्यावरचे दवबिंदू, त्यावर पडलेले सोनेरी किरण मनाला मोहवतात. हे सर्व आम्ही अनुभवलं त्याचे हे वर्णन आहे.

शाहुवाडी जवळील बर्की या छोटय़ाशा गावाजवळ सह्याद्रीच्या रांगामध्ये हा धबधबा निर्माण झालेला आहे. या परिसरात हा बर्की धबधबा म्हणून ओळखला जातो. पावसाळी पर्यटनाचे बेळगाव,सांगली,कोल्हापूर परिसरातील पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे. हजारो पर्यटक दरवर्षी येथे स्नानाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत असताना धबधब्याखाली भिजणे म्हणजे स्वर्गीय अनुभव आहे. निसर्गाचा मुक्त अविष्कार पाहून आपले मन प्रसन्न होते आणि एक वेगळी ऊर्जा पुन्हा आपली नेहमीची दैनंदिन कामे करण्यास यामुळे प्राप्त होते.

कोल्हापूरपासून ५६ कि. मी. अंतरावर हा धबधबा आहे. या ठिकाणी बाजारभोगाव- करंजफेणमार्गे किंवा मलकापूर-येळवण यामार्गे येथे आपण जावू शकतो. धबधबा पाहण्यासाठी मात्र ३ कि. मी. पायी जावे लागते. धबधब्याकडेही जात असताना हिरवे डोंगर, दर्‍या, ओढे-नाले, डोलणारी झाडे-फुले-पाखरे अशी निसर्गाची किमया आपल्या दृष्टीस पडते. दाट जंगलातून पायी जात असतांना छोट-छोटे ओढे पार करताना होणारा पाण्याचा स्पर्श एक वेगळी अनुभूती देतो.

भरपावसात अंगाला येणारा घामाचा दर्प, शिणवटा मात्र हा निसर्ग पहात असतांना कुठल्याकुठे दूर पळून जातो ते कळतच नाही. मात्र यावेळी एक खबरदारी घ्यावी लागते ती म्हणजे वाटेत पाण्यातील जळवापासून सावध राहिले पाहिजे. धबधब्याजवळ पोहचताच शुभ्र जलधारा पाहून आपलं मन मोहरुन तर जातच, रसिक माणसांच्या मनात तर काव्यपंक्तीच येतील अशी ही निसर्गाची किमया आहे. डोळ्याचे पारणे फिटेल असे हे दृश्य मनाला उभारी देते. आम्हीही क्षणभर हे दृष्य पाहून थक्कच झालो.

कोसळणार्‍या पाण्याच्या संगीतावर येणारे विविध पशु-पक्ष्यांचे आवाज एका वेगळ्याच संगीताची निर्मिती करत असतात. त्यातच सदाहरीत वृक्षवेलींनी चौहो बाजूंनी दिलेला वेढा, असे हे सारे वातावरण आपणाला एक वेगळीच ऊर्जा देत, मन ताजे तवाने करते.

शाहुवाडी तालुक्यातील फारशी वर्दळ नसलेले हे ठिकाण पावसाळ्यातील चार महिने पर्यटकांना आकर्षित करत असते. आता पावसाने जोर धरला आहे. वातावरण सर्वत्र हिरवाईने बहरले आहे. अशावेळी घरी बसण्यात काय अर्थ आहे. चला फिरुया, जावूया कोल्हापूरला, भेट देवूया या बर्की धबधब्याला आणि कोसळणार्‍या जलधारेत भिजूया!

  • अविनाश सुखटणकर
  • सौजन्य महान्यूज

    1 thought on “चला जावू या बर्कीला”

    1. Shashikant Ayare.

      कोल्हापूरपासून ५६ कि. मी. अंतरावर हा धबधबा आहे. या ठिकाणी बाजारभोगाव- करंजफेणमार्गे किंवा मलकापूर-येळवण यामार्गे येथे आपण जावू शकतो. धबधबा पाहण्यासाठी मात्र ३ कि. मी. पायी जावे लागते. धबधब्याकडेही जात असताना हिरवे डोंगर, दर्‍या, ओढे-नाले, डोलणारी झाडे-फुले-पाखरे अशी निसर्गाची किमया आपल्या दृष्टीस पडते. दाट जंगलातून पायी जात असतांना छोट-छोटे ओढे पार करताना होणारा पाण्याचा स्पर्श एक वेगळी अनुभूती देतो.

    Leave a Comment