मॉंटेसरी टिचर

भारतात शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र प्रत्येक गावात काही शाळा-महाविद्यालये निघत नाहीत. प्रत्येक गावात तशा प्राथमिक शाळाही असतातच असेही नाही. पण आजकाल वाड्या-पाड्यांवर आणि वस्त्या-वस्त्यांवर अंगणवाड्या मात्र निघत आहेत. तूर्तास तरी या अंगणवाड्यांमध्ये या शिशू गटाला शिकविण्याचे प्रशिक्षण मिळवलेल्या ताई नेमल्या गेलेल्या नाहीत. अंगणवाड्यांची संख्या जास्त आहे आणि प्रशिक्षित शिक्षक-शिक्षिकांची संख्या कमी आहे. काही एक विशिष्ट गरज ओळखून सरकारने अंगणवाड्या तर भरपूर उघडल्या आहेत. परंतु नियोजनाच्या अभावाचे नेहमीचेच दर्शन घडवीत अंगणवाड्या उघडण्याच्या आधी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याची दक्षता घेतलेली नाही.

आता मात्र प्रशिक्षित अंगणवाडी शिक्षक-शिक्षिकांची गरज जाणवायला लागली आहे. शहरांमध्ये सुद्धा काही वस्त्यांमध्ये अंगणवाड्या आहेत आणि नर्सरी स्कूलही भरपूर सुरू झालेले आहेत. या सगळ्या शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक नाहीत. या शाळांचे मोजमाप केले तर बालवाडी आणि अंगणवाडी शिक्षक-शिक्षिका हे क्षेत्र अजून किती तरी मोकळे आहे याची जाणीव होते. अंगणवाड्या तर सरकारतर्फे चालवल्या जातात. परंतु शहरांमध्ये प्ले ग्रुप आणि नर्सरी यामध्ये प्रवेश घेण्यासाठी हजारो रुपयांच्या देणग्या घेतल्या जात आहेत. आपल्या देशातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक नेमण्याची सक्ती आहे. तशी सक्ती अजून या पूर्वप्राथमिक शिक्षणात झालेली नाही. ती होईपर्यंत प्रशिक्षित शिक्षकांची चणचण जाणवणार आहे. मात्र प्ले ग्रुप किंवा नर्सरी अशा शाळा सुरू करताना त्या सुरू करणार्‍या शिक्षकाने आपल्या जाहिरातीमध्ये आपण प्रशिक्षित असल्याचे नमूद केले तर त्या शाळेला थोडे महत्व येईल आणि मुलांनाही चांगले शिक्षण मिळेल. इच्छुकांनी मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठाशी संपर्क साधावा.

Leave a Comment